Tuesday 30 July 2013

श्राद्धामध्ये गाया आर्यभट खाती...!

वारकरी संतांनी लोकजागृतीसाठी अभंगांची रचना केली. याच धर्तीवर महात्मा जोतिबा फुले यांनी अखंड रचले आहेत. फुले यांच्या अखंडांत ब्राह्मणी धर्मावर जबरदस्त प्रहार करण्यात आले आहेत. फुले यांचे काही निवडक अखंड येथे देत आहोत.

अखंड क्रमांक : २५
श्राद्धामध्ये गाया आर्यभट खाती । मौजा मारिताती । मृतानावे ।।१।।
पडझड गाया दीन मांग खाती । ब्राह्मण निंदिती । त्याला सर्व ।।२।।
अहिंसक जती पाणी काढविती । किड्या मोक्ष देती । तृष्णेसाठी ।।३।।
आर्यासह जत्या नाही सत्य त्या । जाती सर्व वाया । जोती म्हणे ।।४।।

अर्थ :
आर्य ब्राह्मण श्राद्धामध्ये गायी (गोमांस) खातात. मृतांच्या नावे मौजा मारतात.
मातंग समाजातील दीन दलित लोक मेलेल्या गायी (गोमांस) खातात, त्याला मात्र हेच ब्राह्मण नावे ठेवितात.
(विहिरींना पाणी लागावे यासाठी बळी देण्याच्या प्रथेचा उल्लेख करताना महात्मा फुले म्हणतात की,) आपली तहान भागावी यासाठी अहिंसक जती (संन्यासी) बळी देतात. वर बळी दिल्या जाणा-या प्राण्याला मोक्ष मिळाला, अशा भाकडकथा पसरवितात.
जोतिबा म्हणतात की, आर्य ब्राह्मण आणि जती यांच्या वागण्यात सत्य अजिबात नाही. हे लोक धर्माच्या नावाखाली जे जे काही करतात ते सर्व वायाच जाते.

अखंड क्रमांक : २९
कल्पनेचे देव करिले उदंड । रचिले पाखांड । हितासाठी ।।१।।
किन्नर गंधर्व ग्रंथी नाचविले । अज्ञ फसविले । कृत्रिमाने ।।२।।
निर्लज्ज सोवळे त्याचे अधिष्ठान । भोंदिती निदान । शुद्रादिक ।।३।।
ब्राह्मणांनी नित्य होऊनी निसंग । शुद्र केले नंग । जोती म्हणे ।।४।।

अर्थ :
(ब्राह्मणांनी) खूप खोटे देव निर्माण केले आहेत. आपल्या हितासाठी (पोट भरण्यासाठी) त्यांनी हे सारे पाखांड रचले आहे.
(ब्राह्मणांनी) ग्रंथांमध्ये किन्नर आणि गंधर्वांना नाचवून अज्ञ जणांना फसविले. गंधर्व किन्नरांच्या सा-या कथा कृत्रिम म्हणजेच खोट्या आहेत.
निर्लज्ज सोवळे हे ब्राह्मणांचे अधिष्ठाण आहे. त्याचा वापर करून ते शुद्रांना भोंदून खात असतात.
जोतिबा म्हणतात की, ब्राह्मणांनी नेहमीच नि:संग होऊन म्हणजेच लाज-लज्जा सोडून शुद्रांना नागविले आहे.



संदर्भ :
महात्मा फुले सम्रग्र वाङ्मय (पान क्रमांक : ५४२)
संपादक : य. दि. फडके
सुधारित पाचवी आवृत्ती, २८ नोव्हे. १९९१
प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ.

अनुक्रमिका येथे पाहा

No comments:

Post a Comment