Monday 28 July 2014

तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!

अपाविमंच्या संशोधक संघाचे अद्भूत सत्यशोधन 

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.


जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा खून झाला की ते सदेह वैकुंठाला गेले, या बाबत अनेक तर्कवितर्क लढविले जातात. खून झाला असे म्हणणारे तुकोबांच्या सदेह वैकुंठगमनाची कथा खोटी आहे, असे म्हणतात. तर सदेह वैकुंठ गमनाची कथा सत्य मानणारे खुनाची कथा खोटी आहे, असे म्हणतात. या वादात सत्य काही नीट हाती लागत नाही. पण थोडीशी बुद्धी लावून विचार केल्यास असे दिसून येते की, तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठाला गेले या दोन्ही गोष्टी सत्य आहेत. 

तुकोबा हे जातीने कुणबी होते. स्वत: तुकोबांनीच हे लिहून ठेवले आहे. "बरे झाले देवा कुणबी केलो । नाही तरी दंभेची असतो मेलो ।।" असे तुकोबा एके ठिकाणी म्हणतात. दुस-या एका अभंगात ते म्हणतात, "तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । परी हा पंढरीनाथ विसंबेना ।।".  कुणबी ही जात ब्राह्मणांच्या दृष्टीने शुद्र होती. ब्राह्मणी पोथ्यांतील आदेशांनुसार शुद्रांना धर्मविचार सांगण्याचा, प्रवचन किर्तन करण्याचा तसेच गुरू होण्याचा अधिकार नाही. वेद वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकारही शुद्रांना नाही, हे सर्वविदीत आहेच. तुकारामांनी ब्राह्मणी पोथ्यांतील या आज्ञांना पायदळी तुडवून "वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।" अशी घोषणा केली. हजारो लोक त्यांचे अनुयायी झाले. तुकोबांनी धर्म भ्रष्ट केला, अशी आवई उठवून ब्राह्मणांनी तुकोबांविरोधात अनेक कारवाया केल्या. गावचा पाटील, धर्मशास्त्री आणि पुण्यातील निजामाचा प्रतिनिधी दादोजी कोंडदेव यांच्याकडे तुकोबांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या. या सर्वच ठिकाणी तुकोबांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. ब्राह्मणी नीती-नियमांच्या त्यांनी चिंधड्या उडविल्या. त्यामुळे चिडलेल्या ब्राह्मणांनी शेवटचा उपाय म्हणून तुकोबांची हत्या करण्याचा कट रचला. इतकेच नव्हे, तर तो तडीस नेला. 

या काळापर्यंत तुकोबा साक्षात्कारी संताच्या पदाला पोहोचले होते. साक्षात विठ्ठलाच्या साक्षात्कारामुळे त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नव्हती. त्यांनी सदेह वैकुंठाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फाल्गुण वद्य द्वितीयेचा मुहूर्त त्यांनी काढला. आपल्या सर्व अनुयायांना त्याची माहिती दिली. या काळात तुकोबांचा बहुतांश काळ भंडारा डोंगरावरच जात होता. लोकांपासून दूर राहावे, यासाठी त्यांनी भंडारा डोंगराची निवड केली होती. नेमका याच काळात ब्राह्मणांनी डाव साधला. वैकुंठगमनाच्या दोन दिवस आधी फाल्गुण पौर्णिमेला म्हणजेच होळीच्या रात्री ब्राह्मणांनी भंडारा डोंगरावर तुकोबांची हत्या केली. मृतदेह तिथल्याच गुहेत दडविला. गुहेचे दार प्रचंड मोठ्या शिळेने बंद करून टाकले. काम फत्ते झाले असे समजून ब्राह्मण निघून गेले. 

पौर्णिमा ते द्वितीया असे अडीच दिवस तुकोबा बेपत्ता होते. पण, साक्षात पांडुरंगच तुकोबांसोबत असल्यामुळे त्यांचे सदेह वैकुंठगमन रोखणे ब्राह्मणांच्या हाती नव्हतेच. फाल्गुण वद्य द्वितीयेला विठोबा आपली पत्नी रखुमाईला घेऊन भंडारा डोंगरावरील त्या गुहेत प्रकट झाले. विठोबाने हळुवार हाक मारली, "तुकोबा उठ." झोपेतून जागे व्हावे त्याप्रमाणे तुकोबा उठून बसले. गुहेच्या तोंडाची शिळा माती होऊन गळून पडली. दिवस उगवायच्या आत तुकोबा देहूत आले. त्यांचे हजारो अनुयायी तेथे वाटच पाहत होते. ठरलेल्या वेळी आणि इंद्रायणीच्या काठावरील ठरलेल्या स्थळी सर्व जण एकत्र गोळा झाले. साक्षात विठ्ठल विमान घेऊन आले. तुकोबांनी सर्वांचे क्षेमकुशल घेतले. आणि विमानात बसून ते वैकुंठाला निघुन गेले. 

"तुका सप्तशती" नावाच्या जुन्या ग्रंथात वरील कथा आली आहे. हा ग्रंथ पूणं रुपाने आता उपलब्ध नाही. त्याची काही प्रकरणेच उपलब्ध आहेत. हा ग्रंथ मोडीत आहे. याची एक अत्यंत दुर्मिळ प्रत अपाविमंच्या हाती लागली आहे. ब्राह्मणांनी अनेक कारस्थाने केली. त्यात हा ग्रंथ संपविण्याच्या कारस्थानाचाही समावेश आहे. तथापि, या धर्मभूमीचे भाग्य थोर म्हणून या ग्रंथाचा काही भाग का होईना या विध्वंसातून टिकून राहिला. हा ग्रंथ आम्ही लवकरच अपाविमंवर वाचकांसाठी जशाच्या तशा टाकणार आहोत.


संबंधित लेख

तुकोबांचा खून झाला आणि ते सदेह वैकुंठगालाही गेले!
अशी झाली तुकोबांची हत्या

12 comments:

  1. या सत्यशोधनाबद्दल कोणाला शंका असल्यास जरूर व्यक्त कराव्यात. अपाविमंचा संशोधक संघ सर्व शंकांचे निरसन करण्यास सिद्ध आहे. या लेखाखाली प्रतिक्रिया टाका. योग्य असलेल्या प्रतिक्रियांना उत्तर दिले जाईल. खोडसाळ प्रतिक्रियांची दखल घेतली जाणार नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. सत्य शोधन कि दोन तोंडी मांडूळ भूमिका ?

      Delete
  2. Donhi dagarivarati paay? Vaikunthgaman mhanaje andhshraddhechaa kalas navhe kaay?

    ReplyDelete
  3. विकास,

    दोन्ही डगरीवर पाय-हात म्हणून सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, अपाविमंवर पुराव्याशिवाय एक ओळही लिहिली जात नाही. या लेख मालेतील दुसरा लेख आजच आम्ही पोस्ट केला आहे. तो वाचा. त्यात आम्ही ठोस पुरावे दिले आहेत. या लेखमालेची ही नुकतीच सुरूवात आहे. पुढे आम्ही आणखी ठोस पुरावे देणारच आहोत. तूर्तास हे दोन्ही लेख वाचून मनन आणि आत्मपरिक्षण करा.

    तुकोबांचे वैकुंठगमन ज्यांना अंधश्रद्धेचा कळस वाटतो, त्यांनी सत्यनारायणाच्या कथेतील अंधश्रद्धेबद्दल बोलावे. सत्यनारायण घालणे बंद करण्यासाठी मोहिम हाती घ्यावी. मगच तुकोबांच्या वैकुंठगमनाचा विषय काढावा.

    ReplyDelete
    Replies
    1. असत्य नारायणाच्या कथेचा आणि तुकोबांचा काय संबद्ध जरा स्पस्ट करावे ?

      Delete
  4. Tukobanchi hatya zali he gruhit dharu shakto pan pudhacha varnan andhshraddha tasech tokobanchya karyabddal visangati nirman krto. Tukobanche abhangach mulat devanchya chamatkar virodhat hote. Tyat vainkutgaman hone he tyana tari patala asta ka?

    ReplyDelete
    Replies
    1. श्री. भालेश यादव,

      तुकोबांची हत्या झाली हे सत्यच आहे. पण तुकोबा सदेह वैकुंठाला गेले हेही तेवढेच सत्य आहे. तुकोबांच्या वैकुंठगमनाबद्दल "तुकाराम गाथ्या"त अभंग आहेत. त्याविषयी आम्ही पुढील भागांत लिहिणारच आहोत. वैकुंठगमनाविषयीचा स्वतंत्र भागच गाथ्यात आहे. पण, अडचण अशी होते की, आपणापैकी बहुतेकांनी गाथा वाचलेलाच नसतो. तुकोबांच्या हत्येविषयीचे सूचन करणारे अभंगही गाथ्यात आहेत. "आपुले मरण पाहिले म्या डोळा । तो झाला सोहळा अनुपम्य ।।" हा अभंग तुकोबांच्या हत्येचेच सूचन करतो. या विषयावरही आम्ही पुढील भागांत लिहिणार आहोत.

      तुकोबांचे अभंगच मुळात देवांच्या चमत्कारांच्या विरोधात होते, असे विधान तुम्ही केले आहे. ते फारच मोघम आहे. तुकोबांच्या अभंगांना अशा प्रकारे विरोध-समर्थनाच्या तराजूत तोलले जाणे चुकीचे आहे. तुकोबांच्या पायावर उष्ण पाणी टाकल्यामुळे रामेश्वर भट्टांच्या अंगात दाह सुरू झाला. हा दाह शांत करण्यासाठी तुकोबांनी अभंग लिहून पाठवला आणि रामेश्वर भट्टांचा दाह शांत झाला. अशी आख्यायिका आहे. रामेश्वर भट्टांसाठी लिहिलेला हा अभंग गाथ्यात आहे. "चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती । व्याघ्र ही न खाती सर्प तया ।।" हा तो अभंग आहे. याला कोणी चमत्कार म्हणू शकते.

      तुकोबांना आजच्या काळातील रूढ मतांच्या फूटपट्टग़ा लावणे चुकीचे आहे. नरेंद्र दाभोळकरांनी केलेल्या अंधश्रद्धेच्या व्याख्येत तर तुकोबांना अजिबातच तोलू नये. स्वत: दाभोलकर हेच एक भोंदू होते. त्यांनी केवळ बहुजन समाजातील श्रद्धांना विरोध केला. "आम्ही धर्मात हस्तक्षेप करीत नाही", असे म्हणून दाभोलकरांनी ब्राह्मणी अंधश्रद्धांना नेहमीच अभय दिले.

      तुकोबा चमत्कारांच्या विरोधात होते, असे म्हणण्यापेक्षा तुकोबांनी भोंदूपणाला विरोध केला असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. आम्हाला खात्री आहे की, आज तुकोबा हयात असते, तर त्यांनी पहिल्यांदा नरेंद्र दाभोळकरांच्या कथित अंधश्रद्धा विरोधाचीच सर्वप्रथम चिरफाड केली असती.

      आपण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.

      Delete
  5. तुकोबांची हत्या झाली हे सत्यच आहे. पण तुकोबा सदेह वैकुंठाला गेले हेही तेवढेच सत्य आहे----------------> -राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती! शिकलेली माणसे सुद्धा असा जुनाट पोथ्यांचा ("तुका सप्तशती" या ग्रंथालाच "वैकुंठ गाथा", ग्रंथाचा कर्ता आधूत कोळी नामक कवी) आधार घेऊन असे विवेकी बुद्धीला न पटणारे विचार जेंव्हा मांडता तेंव्हा फार-फार दुखः होते. माझ्या मते त्यामध्ये वास्तव खूपच कमी आणि कवी कल्पनेच्या उत्तुंग भरारीच जास्त वाटते. अशा संशोधनास स्वीकृती मिळणे केवळ अशक्यच!

    ReplyDelete
  6. नाही वैकुंठाला गेला ।
    तुका मारूनी टाकला ।
    डाव्या हाताचा कलंक ।
    उजव्या हाताने झाकला ॥१॥
    ऐसे बोलीले बयान । आले नेण्यासी विमान ।
    त्यात बैसुनिया तुका ।
    गेला निघुनी गुमानं ॥२॥
    खरे काय , काय खोटे । सत्य
    जाणूनी घेवावे ।
    मीही सांगितले म्हणुनी । नाही विश्वासी रहावे ॥३॥
    गीतेवरी भाष्य ग्रंथ ।
    तुका लिही मंत्रगीता । त्याने
    भडकला तेंव्हा । वेदाभिमान्यांचा
    माथा ॥४॥
    वर्णव्यवस्था तयाने । सारी येईल धोक्यात ।
    वेदाविरोधाचे ज्ञान । कैसे भरले
    तुक्यात ? ॥५॥
    रामेश्वर भटा सांगे । सांगे
    मंबाजी चुगली ।
    मन कर्मठांची मने । तुका रोषाने फ़ुगली ॥६॥
    रामेश्वराच्या दिवाणी । न्याय
    मागूनी घेतला ।
    तुकोबांचा ग्रंथसाठा । इंद्रायणीत
    फ़ेकला ॥७॥
    होते तुकाचे अभंग । बहु लोकायच्या तोंडी ।
    पुन्हा आले जनलोकी । कैसी होणार
    गा कोंडी ॥८॥
    रामेश्वर मंबाजीने । मारियले तुकोबास ।
    आणि सांगिले जगाला ।
    तुका गेला वैकुंठास ॥९॥

    -टॉम मोर्वोलो रिडल

    ReplyDelete
  7. तुकोबारायांनी अभंगाद्वारे स्वत: वैकुंठ नाकारलेला आहे..ते म्हणतात--

    "सांडूनी सुखाचा वाटा |
    मुक्ती मागे तो करंटा ||
    का रे न घ्यावा जन्म |
    काय वैकुंठी जाऊन ||
    येथे मिळतो दहीभात |
    वैकुंठी ते नाही मिळत ||
    तुका म्हणे न लागे मुक्ती |
    राहीन संगे संताचिया ||"

    --संत तुकोबाराय.

    ReplyDelete
  8. संत तुकाराम आणि चमत्कार...

    आमचे प्राचीन धर्मग्रंथ हे चमत्कारांनी खचाखच भरलेले आहेत. मुळात माणूस हा धर्मवेडा आहे, आणि जेव्हा धर्मग्रंथच चमत्कारांचे समर्थन करताना दिसतात तेव्हा तो साहजिकच डोळे झाकून विश्वास ठेवतो. पिढ्यानपिढ्या हे चालत आले असल्याने ह्या विज्ञान युगात तरी वेगळे काय पाहायला आणि ऐकायला मिळणार? आणि म्हणूनच घरात बसवलेला शाडूचा गणपती भक्ताच्या वाटीतले दुध पितो!

    चमत्कार म्हणजे तरी काय? तर 'जे अशक्य ते शक्य करून दाखवणे' म्हणजे चमत्कार! ज्याला दैवी शक्ती प्राप्त झालेली असते अशी व्यक्ती चमत्कार करू शकते, अशा प्रकारची लोकसमजूत आहे; आणि त्यामुळेच भोंदू बुवा, बाबा काही तरी चिल्लर स्वरूपाची हातचलाखी करून हवेत मोकळा हात फिरवून सोन्याची साखळी काढून दाखवतात. तर काही विज्ञानाचे एखादे तत्त्व वापरून पाण्याचा दिवा पेटवून दाखवितात. पण हे खऱ्या अर्थाने चमत्कार नसतात.

    'चमत्काराशिवाय नमस्कार नसतो' हे भोंदुगिरी करणाऱ्या बुवा, बाबांनाही माहित असल्याने प्रत्येक भोंदूबाबा वरील प्रकारचा एक चमत्कार करून दाखवत असतो. बुवाबाजी करण्याचे चमत्कार हे एक प्रमुख साधन आहे.

    चमत्कार म्हणजे फक्त कार्य. त्यात कारणाचा पत्ताच नसतो.वास्तविक कुठलेही कार्य कारणाशिवाय घडत नाही; परंतु 'चमत्कार' या प्रकारात हा कार्यकारणभाव शोधूनही सापडत नाही.

    साधू, संत, महंत, महात्मे ह्यांचा मोठेपणा आणि महत्व वाढविण्यासाठी त्यांचे भक्त वा अनुयायी त्यांच्या चरित्राला हरतऱ्हेचे चमत्कार चिटकवतात. अश्या वेड्या, आंधळ्या भक्तांनी "मी चमत्कार जाणत नाही" म्हणणाऱ्या तुकारामानाही सोडले नाही. 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार त्यांच्या बारा बंदीला ठिगळासारखा का होईना पण जोडलाच! अशी आहे आमची 'चमत्कार' या अंधश्रद्धेविषयीची मानसिकता!

    चमत्काराविषयी तुकाराम म्हणतात :-

    कपट काही एक | नेणे भुलवायाचे लोक ||१||
    तुमचे करितो कीर्तन | गातो उत्तम गुण ||२||
    दाऊ नेणे जडीबुटी | चमत्कार उठाउठी ||३||
    नाही शिष्यशाखा | सांगो अयाचित लोका ||४||
    नव्हे मठ-पती | नाही चाहुरांची वृत्ति ||५||
    नाही देवार्चन | असे मांडिले दुकान ||६||
    नाही वेताळ प्रसन्न | काही सांगे खाण खुण ||७||
    नव्हे पुराणिक | करणे सांगणे आणिक ||८||
    नेणे वाद घटा पटा | करिता पंडित करंटा ||९||
    नाही जाळीत भणदी | उदो म्हणोनि आनंदी ||१०||
    नाही हालवीत माळ | भोंवते मेलवुनि गाबाळ ||११||
    आगमीचे नेणे | स्तंभन मोहन उच्चाटणे ||१२||
    नव्हे यांच्या ऐसा | तुका निरयवासी पिसा ||१३|| (१३७)

    वरील आत्मकथनातून आपण कोण आहोत? आणि कोण नाही आहोत? याविषयी तुकाराम अतिशय प्रांजळपणे आपली भूमिका स्पष्ट करतात. आपण कोण नाही, हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पुढील प्रकाराचा निषेधच केला आहे. लोकांच्या फसवणुकीसाठी कपट कारस्थान करणे, लोकांना जडीबुटी देणे, चमत्कार दाखवणे, शिष्य करून घेणे, मालकीचा मठ असणे, मालकीची जमीन असणे, देव्हाऱ्ह्यात पुजेची उपकरणे, पूजा द्रव्यांचा पसारा असणे, वेताळ प्रसन्न असणे, आचार विचारात विसंगती असणारा पुरोहित असणे, भंदे खेळणारा देवी भक्त असणे, घटाकाश, पटतंतू विधी करणारा वैदिक असणे, करंटा विद्वान असणे, माळ ओढणारा जपी असणे, जारण मारण, उच्चाटन, मोहन करणारा मांत्रिक, तांत्रिक असणे.

    वरील सर्व प्रकार हे तद्दन खोटे असल्याने कर्मकांडी स्वरुपातल्या त्या अंधश्रद्धाच आहेत. त्यांचा धिक्कार करणारे तुकाराम खरोखर पारदर्शी व्यक्तिमत्वाचे आहेत. एवढा एक अभंग अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, कर्मकांडे ह्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना मूठमाती देण्यास पुरेसा आहे. आपल्या घणाघाती प्रहाराने तुकारामांनी त्याचा चक्काचूर केला आहे.

    पण यातली गम्मत अशी की, जे तुकाराम 'मला चमत्कार दाखवता येत नाही' असे प्रांजळपणे सांगतात. त्यांच्याच नावावर 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार लोकांनी खपावावा, हा हास्यास्पद प्रकार असून धक्कादायकही आहे, तसाच तो तुकारामांवर अन्याय करणाराही आहे; पण चमत्कार वेड्यांना त्याचे काय?

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या लीखाणाने चांगलीच माहीती मीळाली.
      धन्यवाद

      Delete