Wednesday 28 September 2022

मी नास्तिक का आहे?

सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ अशा ईश्वराचे अस्तित्व मी केवळ माझ्या बढाईखोरपणामुळे नाकारतो आहे का, या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल अशी मला कधीही कल्पना नव्हती. पण काही मित्रांशी बोलताना माझ्या असे लक्षात आले की, माझा जो काही थोडासा सहवास त्यांना मिळाला त्यावरून त्यांनी जवळपास असा निष्कर्ष काढला आहे की, माझा देवावरचा अविश्वास हा जरा अतिरेकीपणाच आहे आणि माझ्या नास्तिक असण्यामागे बराचसा उथळपणा व दिखावेगिरी एवढीच कारणे आहेत. पोकळ ऐट हा माझ्या स्वभावाचा एक भाग निश्चितच आहे. माझ्या सहकार्‍यांत मी ‘एकाधिकारशहा‘ म्हणूनच ओळखला जात होतो. माझे स्नेही बटुकेश्वर दत्त हेसुद्धा कधी कधी मला तसे म्हणत. ऐट किंवा अगदी काटेकोरपणे सांगायचे झाले तर ‘अहंकार‘ हा स्वतःबद्दलच्या गैरवाजवी अभिमानाचा अतिरेक असतो. या गैरवाजवी अभिमानामुळे मी नास्तिकतेकडे वळलो आहे की या विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास व बरेचसे चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अश्रद्धेपर्यंत आलो आहे. या प्रश्नाची मी इथे चर्चा करू इच्छितो. सर्वप्रथम मला हे स्पष्ट करावेसे वाटते की अहंमन्यता आणि पोकळ ऐट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
या माझ्या सर्व मित्रांच्या म्हणण्यानुसार दिल्ली बॉम्ब प्रकरण व लाहोर कट या खटल्यांच्या सुनावणीच्या वेळी मला मिळालेल्या अवाजावी प्रसिद्धीमुळे कदाचित मी गर्विष्ठ झालो आहे. त्यांचे म्हणणे बरोबर आहे का ते आपण पाहू या. माझ्या नास्तिकतेचा उगम इतक्या अलीकडचा नाही. माझ्या या वरील मित्रांना ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती असा एक अप्रसिद्ध तरुण जेव्हा मी होतो तेव्हापासून मी देवावर विश्वास ठेवणे थांबविले होते. नास्तिकतेकडे वळवू शकेल असा कोणताही स्वतःबद्दलचा गैरवाजवी अभिमान निदान महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यात निर्माण होण्याचे काहीच कारण नव्हते. काही प्रोफेसरांचा मी आवडता आणि इतरांचा नावडता होतो, तरीही मी कधी अभ्यासू किंवा चमकणरा मुलगा नव्हतो. ज्याला ऐट म्हणतात, अशा प्रकारची भावना निर्माण होण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. किंबहुना ज्याच्यात पुढील व्यवहारातल्या आयुष्यक्रमाबाबत एक प्रकारचा निराशावाद होता अशा शामळू व बुजर्‍या वृत्तीचा मी मुलगा होतो आणि त्या काळात मी संपूर्णपणे नास्तिक नव्हतो. ज्यांच्या देखरेखीखाली मी वाढलो ते माझे आजोबा कर्मठ आर्यसमाजी होते. आर्यसमाजी हा बाकी काहीही असो, पण तो नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मी लाहोरच्या डी. ए. व्ही. शाळेत गेलो आणि एक वर्ष मी तेथल्या वसतिगृहात राहिलो. तेथे सकाळ-संध्याकाळच्या प्रार्थनेव्यतिरिक्त मी तासन्‌ तास गायत्री मंत्र पठण करत असे. त्या काळात मी पूर्णपणे श्रद्धाळू होतो. नंतर मी माझ्या वडिलांबरोबर राहू लागलो. कर्मठ धर्ममताच्या बाबतीत पाहिले तर ते उदारमतवादी आहेत. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्याची स्फूर्ती मला त्यांच्या शिकवणीतूनच मिळाली. पण ते नास्तिक नाहीत. ते कट्टर आस्तिक आहेत. रोज प्रार्थना म्हणण्यास ते मला प्रोत्साहन देत असत. अशा प्रकारे मी लहानाचा मोठा झालो.

१९२७ च्या मेमध्ये मला लाहोर येथे अटक झाली. दुसर्‍या दिवशी मला रेल्वे पोलीस कोठडीत नेण्यात आले. इथे मला सबंध महिन्याचा काळ कंठायचा होता. त्याच दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त स्वास्थ्य व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बर्‍याच विचारांती मी निर्णय घेतला की, देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही, नाही ते कधीही शक्य नाही. ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो. काही गोष्टींच्या बदल्यात स्वतःची मान वाचवण्याची इच्छा मी कोणत्याच क्षणी केली नाही. म्हणजे मी कट्टर नास्तिक होतो आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही काही साधी गोष्ट नव्हती. श्रद्धा संकटांची व कष्टांची तीव्रता कमी करते. किंबहुना या गोष्टी सुखावहसुद्धा करते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व आधार मिळतो. त्याच्याशिवाय माणसाला स्वतःवरच अवलंबून राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वतःच्या पायावर उभे राहणे हा काही पोरखेळ नव्हे. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असेलच तर, पार वितळून जातो आणि माणूस इतर सर्वसाधारण माणसांच्या श्रद्धांना बेदरकारपणे धुत्कारू शकत नाही. आणि जर त्याने असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढायला पाहिजे की, त्याच्याकडे केवळ पोकळ डौल नव्हे तर याहून दुसरी अशी काही शक्ती असली पाहिजे. सध्याची माझी स्थिती ही नेमकी अशीच आहे. मी माझ्या ध्येयासाठी माझ्या प्राणांचा त्याग करत आहे, याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते?

बालीश असला तरी तुम्ही आणखी एक प्रश्न अर्थातच मला विचारणार. जर देव अस्तित्वात नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवण्यास लोकांनी सुरुवात तरी कशी केली ? याला माझे स्पष्ट आणि थोडक्यात उत्तर असे आहे. जसा ते भूतपिशाच्चांवर विश्वास ठेवायला लागले तसेच हेसुद्धा झाले. फरक इतकाच की ईश्वरावरची श्रद्धा ही सर्वसामान्य पातळीवरची असते आणि त्यासंबंधीचे तत्त्वज्ञानही चांगले प्रगत आहे. लोकांना आपले गुलाम ठेवण्यासाठी पिळणूक करणारे धूर्त लोकांना सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या अस्तित्वाची शिकवण देतात आणि मग आपल्या विशेष अधिकारयुक्त स्थानाला त्यांच्याकडून पावित्र्य व मान्यता प्राप्त करून घेतात आणि यातच धर्माचा उगम आहे असे काही जहालमतवाद्यांचे मत आहे. पण ते मला मान्य नाही; जरी सर्व श्रद्धा, धर्म, पंथ आणि इतर अशा संस्था यापुढे जुलमी व पिळणूक करणार्‍या संस्था, व्यक्ती व वर्ग यांना पाठिंबा देणार्‍या बनल्या आहेत या जहालांच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. राजाविरुद्ध बंड करणे हे प्रत्येक धर्माचे पापच मानले आहे.

देवाचा उगम कसा झाला याबद्दल माझी स्वतःची अशी कल्पना आहे की, माणसाच्या मर्यादा, दुबळेपणा, त्रुटी यांची झालेली जाणीव विचारात घेऊन सर्व परिस्थितींना धैर्याने तोंड देण्यासाठी, सर्व प्रकारच्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसाला आवर घालून त्याच्या वागण्यावर ताबा ठेवण्यासाठी देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण करण्यात आले. स्वतःचे खास असे नियम व आईबापांची उदार सहृदयता या दोहोंनी परिपूर्ण अशा देवाची कल्पना जास्त तपशीलवारपणे पुढे रंगवली गेली. माणूस समाजाला विघातक ठरू नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून देवाचा उपयोग व्हावा या हेतूने दैवी कोप व दैवी नियम या कल्पना मांडल्या गेल्या. देवाची दयाळू व वात्सल्यवृत्ती वर्णिल्याने तो पिता, माता, भगिनी, बंधू, मित्र, मदतनीस अशा रूपात उपयोगी पडू लागला. विश्वासघात झाल्यामुळे किंवा सर्व आप्तस्वकीयांनी दूर केल्यामुळे मनुष्य जेव्हा अत्यंत निराश अवस्थेत असेल तेव्हा आपल्या मदतीला व आधार द्यायला आपला एक सच्चा आप्त अजूनही आहे आणि तो विधाता आहे, सर्वशक्तिमान आहे या कल्पनेमध्ये त्याला आधार मिळतो. आणि आदिमानवाच्या काळात ही गोष्ट खरोखरच उपयोगी होती. नैराश्यामध्ये ईश्वराच्या संकल्पनेचे फार साहाय्य होते.

माणूस कितीही संकटात सापडला तरी त्या सर्वांचा समर्थपणे मुकाबला करण्याचा पुरुषार्थ दाखवायला हवा. माझी अवस्था नेमकी अशीच आहे. मित्रांनो, हा माझा पोकळ दिमाख नव्हे. नास्तिक बनवणार्‍या या माझ्या विचारपद्धतीमुळे मी नास्तिक बनलो आहे. अशा माणसाच्या दृष्टीने पाहिले तर दैनंदिन पूजा व ईश्वरावरची श्रद्धा या सर्वात स्वार्थी आणि स्वतःला काळिमा फासणार्‍या गोष्टी आहेत असे मी मानतो. शेवटपर्यंत म्हणजे अगदी वधस्तंभापर्यंत ताठ मान ठेवून ठाम उभे राहणार्‍या माणसासारखे वागण्याचा मी प्रयत्न करतो आहे.

मी हे दिव्य कसे काय पार पडतो ते पाहू या. माझ्या एका मित्राने मला प्रार्थना करायला सांगितलं. मी जेव्हा माझ्या नास्तिकतेविषयी त्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला, ‘‘तुझ्या अखेरच्या दिवसात तू देवावर विश्वास ठेवू लागशील.‘‘ मी म्हणालो, ‘‘नाही. महाशय, असे कधीच होणार नाही. असे करणे म्हणजे तोंडाला काळिमा फासणारे आणि मनोधैर्य खचणारे कृत्य आहे असे मी समजेन. स्वार्थी हेतूंसाठी मी प्रार्थना करणार नाही.‘‘ वाचक आणि मित्र हो, याला तुम्ही पोकळ ऐट म्हणाल काय ? अर्थात ती आहे असे जरी म्हणालात, तर मला अभिमानच आहे.

--- वीर भगत सिंह
जन्म: सप्टेंबर २८ १९०७
विलय: मार्च २३ १९३१

(Rahul Bansode कृत अनुवाद)

Wednesday 14 September 2022

गिरणी कामगार संप

(गिरणी संपावर स्व.जयंत पवार यांचा मटात आलेला एक असाधारण लेख.)

(डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला आज १८ जानेवारी २०१७ ला पस्तीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता, त्या काळातल्या घडामोडी, त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा जयंत पवार यांचा लेख.)

ट्रॅजेडीतला नायक नियतीच्या संकेतांनुसार स्वत:च्या पावलांनी आत्मनाशाकडे चालत जातो. ८२ सालात निर्माण झालेल्या परिस्थितीला नियती म्हणायचं असेल तर गिरणी कामगार हा धीरोदात्त नायकाप्रमाणे आपली शोकांतिका रचत गेला असं म्हणावं लागेल.
डॉ. दत्ता सामंतांचा संप म्हणून जो जगाच्या इतिहासात नोंदला गेला तो ६५ गिरण्यांमधल्या अडीच लाख कामगारांचा अभूतपूर्व संप १८ जानेवारीपासून सुरू झाला तरी त्याची बीजं त्याआधी तीन महिने दिवाळी बोनसच्या निमित्तानेच पडली होती. गिरणी कामगारांची अधिकृत युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ म्हणजेच आरएमएमएसने कामगारांना २० टक्के बोनस द्यायला लावू असं आश्वासन देऊन आयत्यावेळेला ८.३३ ते १७.३३ टक्के बोनसवर मालकांशी तडजोड केल्याने कामगारांत विश्वासघाताची भावना निर्माण झाली होती. निषेध म्हणून १५ गिरण्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला. दुसऱ्या दिवशी त्यातल्या सात गिरण्यांचे कामगार कामावर परतले तरी हिंदुस्थान मिलच्या ४ गिरण्या स्टॅण्डर्ड,श्रीनिवास, प्रकाश कॉटन आणि मधुसूदन मिलमध्ये संप सुरूच राहिला. २२ ऑक्टोबर रोजी स्टॅण्डर्डचे कामगार अरविंद साळसकरांच्या नेतृत्वाखाली डॉ. दत्ता सामंतांच्या घाटकोपरच्या ऑफिसवर मोर्चाने गेले. त्यांनी सामंतांना नेतृत्व स्वीकारायची गळ घातली आणि डॉक्टरांनी त्यांना तेव्हा चक्क नकार दिला होता. डॉक्टर म्हणत होते , ‘ संपाच्या भानगडीत पडू नका. वेळवखत बरोबर नाही , गोदामात कापडाचे तागे पडून आहेत , मालकांना कामगार कपात हवी आहे , तशात लढायला कामगारांची तयारीही झालेली नाही. ‘ पण कामगार पेटलेले होते. म्हणाले , आम्हाला लढायचं आहे , तुम्ही नेतृत्व करा , बास! सामंत समजावू लागले तेव्हा त्यांनी सामंतांचीच निर्र्भत्सना केली. तुम्ही ‘ हो ‘ म्हणत नाही तोवर आम्ही इथून जाणार नाही , आम्ही घेराव घालू , असं म्हणाले. त्यांचा निर्धार पाहून अखेरीस डॉक्टर तयार झाले. तिथून हा मोर्चा ‘ डॉ. दत्ता सामंत की जय ‘ असं ओरडत मध्यरात्री गिरणगावात शिरला तेव्हा सगळा परिसर जागा होता. वाऱ्याने वणवा पेटत जावा तशी ही ठिणगी सगळ्या गिरण्यांमध्ये पसरत गेली आणि सगळीकडे मेसेज गेला , डॉक्टर गिरणीच्या लढ्यात उतरतायत आणि एकदम वीज संचारल्यासारखं झालं सर्वांना.
तरीही एक मोठा गट शिवसेनेकडे आशेने बघत होता. कारण कामगार विभागात सेनेचं वर्चस्व मोठं. एक नोव्हेंबरला बाळासाहेबांनी एक दिवसाच्या बंदचा कॉल दिला होता तो प्रचंड यशस्वी ठरला होता. बाळासाहेब म्हणाले , कामगारांना २०० रुपये पगारवाढ दिली नाही तर १५ नोव्हेंबरपासून गिरण्या बंद होतील. पण काय कांडी फिरली कुणास ठाऊक , कामगार मैदानावरच्या कामगार सेनेच्या भव्य मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे बंदचा कॉल देणार म्हणून मोठ्या आशेने कामगार जमले असता खुद्द बाळासाहेबांचा पत्ता नव्हता. वामनराव महाडिक , नवलकर आदी नेते भाषणातून वेळ काढत होते. कामगार बाळासाहेबांची वाट बघत होते. मुख्यमंत्री अंतुलेंची भेट घेऊन बाळासाहेब ठाकरे आले आणि म्हणाले , आपण संप करत नाही आहोत…सेटिंग झाली होती..बघता बघता कामगार उठून उभे राहिले, बाळासाहेबांच्या दिशेने चपला आणि खुर्च्या भिरकावल्या गेल्या आणि जथ्याजथ्याने कामगार बाहेर पडले. मैदान रिकामं झालं. कामगार उठले ते सरळ सामंतांकडे गेले. त्याआधी सामंतांनी एम्पायर डाइंग मिलच्या कामगारांना २०० रुपये पगारवाढ त्यांच्या युनियनला मान्यता नसताना मिळवून दिली होती. कामगारांना खात्री पटली , आता आपला तारणहार एकच. डॉ. दत्ता सामंत!
१८ जानेवारीच्या आदल्या रात्री संपूर्ण गिरणगावात उत्साह सळसळत होता. चाळींच्या पटांगणांत दिवे पेटले होते पण त्याहून हजारो व्होल्टचे दिवे तिथे जमलेल्या कामगारांच्या तनामनात पेटलेले होते. मुलंबाळं रस्त्यावर उतरून मोठ्यांच्या गप्पा लक्षपूर्वक ऐकत होती. बायका हिरीरीने आपली मतं मांडत होत्या. मध्येच कुठल्यातरी गल्लीतून ‘ डॉ. दत्ता सामंत झिंदाबाद! ‘ ‘ कोण म्हणतो देणार नाय , घेतल्याशिवाय ऱ्हाणार नाय ‘ अशा घोषणा देत मोर्चा निघून जाई आणि वातावरण पुन्हा तापे. दुसऱ्या दिवशी कामावर जायचंच नाही , या कल्पनेने कामगार त्या रात्री झोपलेच नाहीत.
गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला सुरुवात झाली. ६५ गिरण्यांमध्ये एकदम शुकशुकाट पसरला. भोंगे थांबले. लूम्स , स्पिंडल्स थंड झाले. आणि तिसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री अंतुले यांच्या राजीनाम्याची बातमी आली. अंतुलेंनी तोडगा काढण्यासाठी त्रिपक्ष समिती नेमली होती. तिने १५०० रुपये पगारवाढ सुचवली होती. समितीचे एक सदस्य श्रीकांत जिचकार यांनी म्हणे मिल मालकांची बनावट खाती , गैरव्यवस्थापन यांचे पुरावे गोळा केले होते. पण सुगावा लागताच मिल मालक दिल्लीला जाऊन अर्थमंत्री प्रणब मुखजीर् यांना भेटले. मग सगळी चक्रं उलटी फिरली. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्रीपदी आले. संपापूर्वी केंदातून वाणिज्यमंत्री बुटासिंगही येऊन गेले होते. त्यांना कामगारांची बाजू पूर्ण पटली. ते म्हणाले , ‘ १५० ते २०० रु. वाढ देणारच. लगेच फैसला होईल. दिल्लीला जातो. बाईंशी बोलतो आणि फोन करतो. ‘ बुटासिंग गेले पण त्यांचा फोन काही आला नाही. पुढे बाबासाहेब भोसलेंनी कामगारांना ३० रु. अंतरिम वाढ आणि ६५० रु. अॅडव्हान्स देऊ केला , पण सामंतांशी बोलणी न करताच. कामगारांनी ही ऑफर धुडकावली. त्याआधी व्ही. पी. सिंग येऊन गेले होते. मुख्यमंत्र्यांना म्हणाले , सामंतांना बोलवून घ्या. कामगारांत आनंदाची लहर पसरली. आपण जिंकणार! त्यांनी गुलालाची पोती आणली. पण याखेपेस आरएमएमसचे वसंतराव होशिंग , भाई भोसले दिल्लीला इंदिरा गांधींना भेटले. बोलणी व्हायची असतील तर आमच्याशीच झाली पाहिजेत , म्हणाले. पुन्हा सूत्रं फिरली आणि दिल्लीला गेलेले व्ही. पी. परतलेच नाहीत.
डॉक्टर सामंतांची मागणी होती १५० ते २०० रुपये पगार वाढीची , अन्य सुविधांची. मान्यताप्राप्त युनियनशीच वाटाघाटींची सक्ती करणारा बी.आय.आर. कायदा रद्द करावा ही प्रमुख मागणी होती पण त्यांच्या संपाचा कणा ठरली ती बदली कामगारांच्या प्रश्नाची मागणी. गिरण्यांत ४० टक्के बदली कामगार होते आणि त्यांना महिन्याचे केवळ ४ ते १५ दिवस काम मिळायचं. वर्षानुवर्षं ते परमनंट होत नव्हते. तशात त्यांना रजा आणि अन्य सुविधांसाठी वर्षाकाठी २४० दिवस भरण्याची सक्ती होती. आठ-आठ वर्षं बदलीत घालवलेले हजारो तरूण तडफडत होते. ते सगळे रस्त्यावर उतरले. गिरण्यागिरण्यांमधून कमिट्या स्थापन झाल्या. त्यांच्या गेटवर मिटिंगा होऊ लागल्या. गेटवर कामगार पहाऱ्याला बसले. सहा गिरण्यांचा एक झोन करून त्याची एक कमिटी करण्यात आली. या कमिट्या सामंतांच्या संपर्कात राहात आणि पुढची दिशा ठरवत. घाटकोपरचं कार्यालय रात्रंदिन गजबजलेलं असे. पुढे पुढे काहीच तोडगा निघण्याची चिन्हं दिसेनात तेव्हा कामगारांना डॉक्टर म्हणायचे , बघा , हे असं आहे. काय करायचं ? कामगार म्हणायचे , तुम्ही जे ठरवाल ते आम्ही मानू. आणि निघून जायचे.
ही रग कुठून आली ? ४९ साली अमलात आलेलं पगाराचं स्टॅण्डर्ड ८२ सालातही बदललेलं नव्हतं. इतर उद्योगधंद्यातले कामगार कितीतरी पुढे गेले , पण गिरणी कामगार वर्षाला चार रुपये पगार वाढ घेत खुरडत राहिला. ७४चा डांगेंचा ४२ दिवसांचा संप ४ रुपये पगारवाढीवर मागे घेण्याची नामुष्की ओढवली. जनता पाटीर्च्या काळात पुलोद सरकार आल्यावर आशा पालवल्या. पण शरद पवार-जॉर्ज फर्नांडिस यांनी अवघी ४२ रुपये पगारवाढ केली. आरएमएमएसने तर कायम मालकधाजिर्णे निर्णय घेतले. कामगारांना कोणीच वाली उरला नव्हता. ज्याच्या घामातून हे शहर उभं राहिलं तो इथला मूळ कामगार सतत अपयशाचा धनी होत धुमसत राहिला होता आणि त्यामुळेच निर्णायक लढ्यासाठी सज्ज झाला होता.
संप फुटण्याची चिन्हं दिसत नव्हती. अशावेळी इंदिरा गांधींनी मिसाखाली अटक केलेल्या बाबू रेशीम , बाब्या खोपडे आदी गँगस्टर्सना सोडलं. मिलमध्ये माणसं घुसवायची कामगिरी त्यांच्यावर होती. कमिटीच्या माणसांवर केसेस घालण्यात आल्या. अनेक कार्यकर्ते भूमिगत झाले. जे होते त्यांना पोलीस अपरात्री उचलू लागले. आरएमएमएसच्या( राष्ट्रीय मिल मजदूर संघ) कार्यर्कत्यांनीही याद्या बनवायला सुरुवात केली. मिलमध्ये जाण्यासाठी आमिषं दाखवली जाऊ लागली. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचं प्राबल्य असलेल्या गिरण्या आधी निवडल्या गेल्या. टेक्निकल स्टाफ आणि ऑफिसर्स यांच्यावर मिलमध्ये जाण्याची सक्ती करण्यात आली. एनटीसीच्या मिल्समधल्या अधिकाऱ्यांना पोलिस संरक्षण देऊन आत घुसवण्यात आलं. बाहेर कामगार अन्नाला मोताद झाले होते आणि आत घुसणाऱ्यांसाठी श्री खंड-पुरी , मटण सागुतीच्या जेवणावळी झडत होत्या. अधिकारी मग साचे साफ करू लागले. रा.मि.म.संघाचे कामगार येऊ लागले. घरी बसलेल्या कामगारांत चलबिचल सुरू झाली.
तरीही अनेकांची गिरणीत घुसण्याची छाती होत नव्हती. अनेकजण आशाळभूतपणे गेटवर जाऊन उभे राहात. पण सामंतांचे कार्यकर्ते तिथे असत. एका भागातला कामगार दुसऱ्या टोकाच्या मिलमध्ये कामासाठी नेण्याची स्ट्रॅटेजी होती. कमिटीचे लोक त्यांना ओळखत नसत. मग पिकेटिंग सुरू झालं. संपाच्या बाजूने असलेले संप फोडणाऱ्यांना ट्रेनमध्ये गाठत आणि धुलाई करत. अनेकांचा पाठलाग होई. प्रभादेवीच्या क्राऊन मिलमध्ये कामासाठी वडिलांबरोबर जाणारा सतरा वर्षांचा अनिल साखळकर हा तरूण असाच जिवे मारला गेला. तो काही कोणाचा कार्यकर्ता नव्हता. पोट भरण्यासाठी तो कामाला जात होता. त्याच्या हौतात्म्याची आज संप फोडू पाहणाऱ्यांना याद नाही.
वातावरण चोवीस तास पेटलेलं असे. मोर्चे तर रोजच निघत. आज सेंच्युरी आणि मातुल्य , उद्या रुबी आणि इंदू , परवा मोरारजी आणि मफतलाल अशा गिरण्या ठरवून संपकरी निदर्शनं करीत , अटक करवून घेत. ८ हजार महिलांनी ८ जुलैला रा.मि.म.संघाच्या कचेरीवर मोर्चा नेला. कायदा मंत्री भगवंतराव गायकवाड म्हणाले , कामगारांना आधी कामावर जायला सांगा , मग बोलतो. १६ तारखेला १८०० कामगारांच्या मुलांनी ‘ आमच्या बाबांचा पगार द्या. आम्हाला शिकू द्या ‘ म्हणत मंत्रालयावर मोर्चा काढला. कामाठीपुऱ्यात ७०० कामगारांनी घंटानाद केला. टी. एस. बोराडेंच्या नेतृत्वाखाली कामगारांनी इंदिरा कॉंग्रेसच्या आमदारांच्या घरांवर निदर्शनं केली. महापौर प्रभाकर पै यांनी ७५ नगरसेवकांचा मंत्रालयावर मोर्चा नेला. रा.मि.म.संघाचे भाई भोसले , होशिंग यांच्या घरांवर हल्ले झाले. जेलभरो आंदोलनं झाली. तुरुंग अपुरे पडू लागले. १६ सप्टेंबरला सामंतांनी विधान भवनावर दीडलाख कामगारांचा प्रचंड मोठा मोर्चा नेला. त्यादिवशी धरण फुटून सर्वत्र पाणी व्हावं तसा जिकडे तिकडे कामगार दिसत होता.
पण या सगळ्याचा सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. या लढ्यापेक्षा जुलै महिन्यात अमिताभ बच्चन अपघातात जखमी होऊन ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला , ही बातमी मोठी झाली होती. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अमिताभला पाहायला मुंबईला आले पण ते कामगारांना भेटले नाहीत. रामराव आदिकांनी संपात तोडगा काढला होता पण त्यांना केंद सरकारने गप्प बसवलं. काहीही करून सामंतांशी बोलायचंच नाही , हा केंदाचा एक कलमी अजेंडा होता. यात भरडला तो निरपराध गिरणी कामगार.
अनेक उत्तरप्रदेशीय कामगार भिवंडीला लूम्स चालवायला गेले. अनेकजण आधीच गावी जाऊन बसले होते. पण मुंबईच्या मनिऑर्डरीवर जगणारं कोकण या वाताहतीत अधिकच कर्जबाजारी झालं. मुंबईत तर कामगारांनी दागदागिनेच विकले नाहीत तर स्वत:च्या राहत्या जागा विकल्या. अनेक घरांत फुटके टोप आणि स्टोव्हही राहिले नाहीत. बायकांच्या गळ्यात खोट्या मण्यांची मंगळसूत्रं आली. बाबा मिटिंगवरून येताना काय बातमी आणतात याकडे मुलं आशेने भिरभिरी बघत जागत बसायची आणि उपाशी झोपायची. वह्या-पुस्तकं वाटपाचे कार्यक्रम अनेक झाले , कामगारांना कपडे आणि धान्य वाटप झालं. पण आभाळच फाटलं होतं , तिथे ठिगळ कुठवर लावणार ? कामगार मिळेल ती कामं करू लागले. भाजी विकू लागले , बिगारी कामाची भीक मागू लागले. या संपाने एक झालं , लोकांना भीक मागायचीही लाज वाटेनाशी झाली. त्यांचा ताठ कणा पुरता मोडून गेला. स्वाभिमान ठेचला गेला. ते खुरडत , लाचार होत मिलच्या दारात काम मागायला आले. मालकांनी आणि रा.मि.म. संघवाल्यांनी त्यांच्याकडून शरणपत्रं लिहून घेतली , त्यात भविष्यात कधीही संप न करण्याची , मिळेल ते काम निमूट करण्याची हमी घेतली होती. ज्यादा काम लादलं होतं. अडीच लाख कामगार होते , परतले तेव्हा लाखच होते. दीड लाख कुठे कुठे गेले.
आजच्या पिढीला हा इतिहास पुन: पुन्हा सांगावा लागेल. इतिहासात फक्त जेत्यांच नाव राहत. कदाचित गिरणी कामगारही मुंबईच्या नकाशावरून साफ पुसला जाईल. कदाचित नवं नगर उभं करताना त्याचा नरबळी अपरिहार्य असेल. पण त्याची जिगर , त्याचा लढाऊ बाणा , त्याचे श्रम आणि त्याने उभी केलेली गिरणगाव संस्कृती विसरणं ही इतिहासाशी गद्दारी ठरेल. राज्यर्कत्यांच्या क्रूर उदासीनतेमुळे , कामगार संघटनांच्या मतलबी राजकारणामुळे आणि कामगारांच्या मुळावर येणाऱ्या तत्कालीन औद्योगिक परिस्थितीमुळे आज त्याची कबर खणली जाते आहे. हे अख्खच्या अख्खं ‘ मोहोंनजोदडो’ काळाच्या उदरात गडप होत असताना त्या १८ जानेवारीची पुन्हा याद येते आहे. आज त्या खच्चीकरणाच्या प्रक्रियेला पंचवीस वर्षं होताहेत म्हणे!
– स्व.जयंत पवार

Tuesday 5 April 2022

छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य पेशव्यांनी बळकावले त्याची कहाणी

ऐतिहासिक सांगोला तह

महाराष्ट्रात एक म्हण आहे भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी. संपूर्ण भारतवर्षात बऱ्याच राजशाह्यांना या भटांचा हिसका दिसला. सम्राट अशोकचा नातू बृहदत्त, सिंधचे मौर्य घराणे, मदुराईचे नाईक, म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान, कित्तुर संस्थान, अशा बर्‍याच घराण्यातील ब्राह्मण कारभाऱ्यांनी गदारोळ माजवून त्या सत्तांचा नाश केला. पण भारतीय इतिहासात व्हाईट कॉलरचा गद्दारीचा इतिहास मुद्दाम लपवून ठेवला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज यांनी मोठ्या कष्टाने व जिद्दीने दख्खनच्या पठारावर "मराठा राज्य" उभा केलं. त्यांच्या सरदारांनी निष्ठेने सेवा केल्यामुळे दिल्लीच तख्त पण त्या सावलीत उभे राहीले होते. पण पुढे याच साम्राज्याच्या कारभाऱ्यांनी मराठ्यांची सत्ता गिळायला सुरूवात केली आणि त्यातून आपल्याला पण काहीतरी फुल ना फुलाची पाकळी मिळते म्हणून सरदार लोक ही तमाशा बघत राहिले. शेवटी "सांगोला तह" होऊन "मराठा राज्य" पेशव्यांनी आपल्या नरड्यात घातलं.


महाराणी ताराबाई साहेबांनी व त्यांच्या चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर, दमाजी थोरात, दमाजी गायकवाड, आनंदराव पवार, उदाजी पवार, हिंम्मतबहाद्दुर उदाजी चव्हाण या सरदारांनी ढेरी फुगवणाऱ्या पेशवाईला विरोध केला. तथापि, त्यांचा पराभव झाला. पुढे पेशवा विश्वासराव याच्या लग्नात पेशवा नानासाहेब, कारभारी सखाराम बापू, नाना फडणवीस, महादेव पुरंदरे, रामचंद्र बाबा पटवर्धन यांनी गुप्त कट करून छत्रपती शाहू महाराज यांचे दत्तक पुत्र, सत्तेवर असलेले छत्रपती रामराजा यांना आपल्या पक्षात ओढून घेतले व महाराणी ताराबाई यांच्या पक्षातील दादोबा पंतप्रतिनिधी, यमाजी शिवदेव मुतालिक यांचा सरंजाम जप्त केला तसेच यमाजी शिवदेव यांना "सांगोला" येथे वेढा दिला.


यमाजी शिवदेव हा छत्रपतींच्या गादीशी व महाराणी ताराबाई साहेबांशी निष्ठेने वागणारा होता. त्याने महाराणी ताराबाईंच्या आज्ञेवरून पंतप्रतिनिधी दादोबा, बापूजी नाईक, फत्तेसिंह भोसले यांची मदत घेऊन पेशवाई उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी सदाशिवराव भाऊ पेशवा याने यमाजी शिवदेव याला "सांगोला" किल्ल्यात कोंडले. यमाजी शिवदेव याने बरेच दिवस किल्ला जोमाने लढवला. किल्ला हातात येत नाही व परिस्थिती चिघळून आपल्या आंगलटी येऊ शकते हे हेरून सदाशिवराव भाऊने नाना पेशव्याच्या आज्ञेवरून छत्रपती रामराजा यांना सांगोला किल्यासमोर आणून उभे केले व त्यांची आज्ञा असलेली पत्रे किल्ल्यावर पाठवली. आपला धनी पुढे उभा आहे व तो आपल्याला पायउतार होण्यास सांगतोय, हे बघून यमाजी शिवदेव मुतालिक यांनी लढाई थांबवली; पण आपण किल्ला छत्रपतींच्या हवाली करू व छत्रपतींच्याच सोबत राहू, या अटीवर सांगोला किल्ला सोडला. कितीही स्वामीनिष्ठा!


दि. २५ डिसेंबर १७५० रोजी सांगोला येथील अंबाबाई मंदिरात छत्रपती रामराजा महाराज यांच्याकडून पेशवा नानासाहेब व सदाशिवराव भाऊ यांनी "सांगोला तह" लिहून घेतला. या तहानुसार छत्रपती हे फक्त नावापुरते राहून सगळी सत्ता पेशव्यांच्या ताब्यात गेली. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या "मराठा राज्याचा" जीव कायमचा जावून "पेशवाई" ने जन्म घेतला.

सांगोला तहाचा तपशील असा-

१) छत्रपतींचा सर्व कारभार व राज्याची सर्व कामे पेशव्यांच्या आज्ञेवरून चालतील अशी जाचक अट घालण्यात आली.

२) छत्रपतींच्या खर्चासाठी काही भाग तोडून देण्यात आला व छत्रपतींवर नजर ठेवण्यासाठी बापू चिटणीस याच्या हाताखाली राजवाड्यावर चौकी बसण्यात आली.

३) अष्टप्रधान बरखास्त करून तोफखाना, हत्ती, जडजवाहीर, दप्तर व सैन्य साताऱ्यातून पुण्यात नेण्यात आले.

४) फत्तेसिंह भोसले यांचा प्रदेश कापून त्यांना केवळ अक्कलकोट देण्यात आले. तसेच त्यांना शांत बसावे अशी तंबी देण्यात आली. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्र्यंबक हरी पटवर्धन याची नेमणूक झाली.

५) बापूजी नाईक बारामतीकरांकडून कर्नाटक प्रांत काढून सर्व प्रांत सदाशिवराव भाऊच्या नावावर करण्यात आला.

६) यमाजी शिवदेव मुतालिक याची मुतालिकी त्याचा पुतण्या वासुदेव याला देण्यात आली तर दादोबा पंतप्रतिनिधी याच्या ठिकाणी भवानराव पंतप्रतिनिधी याची नेमणूक करण्यात आली

७) आंग्रे, गायकवाड, शिंदे, होळकर यांनी छत्रपतींच्या ऐंवजी पेशव्यांना जमाखर्च सांगून दरवर्षी खंडणी द्यावी.


संदर्भ_ मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ६
लेखक_ वि. का. राजवाडे