Tuesday 20 September 2011

मराठा आणि कुणबी एकच


मराठा-कुणबी भाग - १

मराठा आणि कुणबी एक आहेत की दोन, हा प्रश्न सध्य महाराष्ट्रात वादाचा मुद्दा ठरला आहे. ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळाल्यानंतर मराठ्यांनी आरक्षणावर दावा सांगितला आणि या विषयाला तोंड फुटले. या मुद्यावर कायद्याच्या पातळीवर, राजकीय पातळीवर तसेच वैचारिक पातळीवर अशा तीन आघाड्यांवर वाद सुरू आहे. विविध आयोग न्यायालयांचे निर्णय या सर्वांचा आधार घेऊन युक्तिवाद होत आहे. हा मुद्दा जास्तीत जास्त क्लिष्ट करण्याची खेळी काही मराठा-कुणबीविरोधी शक्ती खेळत आहेत. विविध न्यायालयांचे निकाल आणि आयोगांचे अहवाल उकरून काढण्यामागे हीच ही खेळी आहे. मराठा-कुणब्यांनी हा डाव समजून घेतला पाहिजे.
हा वाद निकाली काढायचा असेल, तर कोर्टांचे निकाल आयोग यात न अडकता काही शतके मागे जावे लागेल. आयोग आणि कोर्ट या गेल्या ५०-६० वर्षांतील गोष्टी आहेत. त्यांना प्रमाण मानून हा वाद सोडविणे म्हणजे सत्याकडे पाठ फिरविणेच होय. इंग्रजी राजवटीपासून संपूर्ण भारत देशाचे प्रशासन ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. स्वातंत्र्यापूर्वी तर प्रशासनान ब्राह्मणांना अघोषित १०० टक्के आरक्षण होते. सरकारमधील बहुतांश सर्व नेटिव्ह नोकरदार ब्राह्मण होते. ब्राह्मणांचा मराठा-कुणबी आणि इतर जातींविषयीचा द्वेष सर्वविदितच आहे. ब्राह्मणांचा मराठा-कुणबी द्वेष सिद्ध करण्यासाठी शेकडो उदाहरणे इतिहासात उपलब्ध आहेत. पण त्या सारयांत पडण्याची गरज नाही. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला महराष्ट्रातील ब्राह्मणांनी केलेला विरोध एवढे एकच उदाहरण त्यासाठी पुरेसे ठरावे.
असो. मुख्य मुद्दा असा की, प्रशासनात असलेल्या ब्राह्मण वर्गाने मराठ्यांत अधिकाधिक भेद निर्माण करण्यासाठी कुणबी आणि मराठा या दोन स्वतंत्र जाती असल्याचे षडयंत्र रचले. व तसा प्रभाव निर्माण केला. मंडल आयोगानुसार कुणबी ही जात ओबीसींत मोडत असली, तरी कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविणे प्रशासनातील वर्चस्ववाद्यांनी जवळपास अशक्य करून ठेवले आहे. दुसरा मुद्दा आहे, आरक्षणातील वाट्याचा. आपला समाज जातींत विखुरलेला आहे आणि प्रत्येक जात स्वार्थी आहे, हे कटू असले तरी सत्य आहे. या पार्श्वभूमीवर मंडल आयोगातील इतर जातींतूनही मराठ्यांचा समावेश ओबीसींत करण्यास विरोध होताना दिसतो.  
या जातीय भूमिकेतून मोठमोठे विचारवंतही सुटलेले नाहीत. जोपर्यंत आपल्या जातीच्या हितसंबंधांना बाधा येत नाही, तोपर्यंत विचारवंत लिबरल असतो. वैश्विक विचार करतो. आपल्या जातीच्या हितसंबंधांना बाधा पोहोचायला लागली की, हेच विचारवंत विहिरीतला बेडूक बनून आपल्या जातीच्या हिताचे रक्षण करतात. असे अनेक जातीयवादी बेडकं आज महाराष्ट्रात विचारवंत म्हणून मिरवित आहेत. त्यापैकी काहींशी माझा फेसबुकच्या व्यासपीठावर वादही झडला आहे.
कुणब्यांचे मूळ शोधायचे तर पूर्वकाळात चला
मराठा आणि कुणबी या जाती कशा एकच आहेत, हे पाहण्यासाठी आपण टप्प्या-टप्प्याने इतिहासात मागे डोकावू या. आधी आपण महाराष्ट्रातील विचारवंतांच्या ‘बापांचे बाप' तसेच  या देशातील दिन-दलित, शोषित आणि शेतकरी वर्गाचे पहिले कैवारी महात्मा फुले यांचे काय म्हणणे आहे ते पाहू या. ब्राह्मण इतिहासकार छत्रपती शिवाजी राजांना ‘गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवंस'  अशी उपाधी लावतात. महात्मा फुले मात्र महाराजांना क्षत्रिय कुलवंस म्हणण्याचे नाकारतात. त्याऐवजी फुले महराजांना ‘कुळवाडी भूषण' म्हणतात. कुळवाडी भूषण म्हणजेच शेतकऱ्यांचे भूषण असलेला. महात्मा फुल्यांनी इ.स. १८६९ साली शिवाजी राजांचा ‘पवाडा'  लिहिला. फुल्यांनी ‘पोवाडा' असे  म्हटलेले नाही, ‘पवाडा'  म्हटले आहे. पोवाडा हे पवाड्याचे ब्राह्मणी रूप आहे. ते फुल्यांनी टाळले. यावरून फुले शब्दांच्या बाबतीत किती काटेकोर होते, हे स्पष्ट होते.
फुल्यांचा पवाडा 
या पवाड्याचे पुस्तकच फुल्यांनी प्रसिद्ध केले होते. त्यात फुल्यांनी मराठा जातीचा कोठेही उल्लेख केलेला नाही.
पवाड्याच्या प्रस्तावनेत फुले म्हणतात -
‘‘...अति जुनाट यवनी व मेसर्स ग्रांडफ (मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ग्रँट डफ), मरी वगैरे इंग्रज लोकांच्या बहुतेक लेखी आधारावरून हा पवाडा केला आहे. कुणबी, माळी, महार, मांग, वगैरे पाताळी घातलेल्या क्षेत्र्यांच्या उपयोगी हा पवाडा पडावा असा माझा हेतू आहे. लांबच लांब मोठाले संस्कृत शब्द मुळीच घातले नाहीत. व जेथे माझा उपाय चालेना तेथे मात्र लहानसहान शब्द निर्वाहापुरते घेतले आहेत. माळी कुणब्यांस समजण्याजोगी सोपी भाषा होण्याविषयी फार श्रम करून त्यांस आवडण्याजोग्या चालीने रचना केली आहे.''
फुले पुढे म्हणतात - ‘‘... या हिंदूस्थानांत मात्र ब्राह्मणांनी आपल्यास मोठ्या दिमाखाने उंच मानून परभू, कुणबी, माळी, मांग आणि महार इत्यादि जातीचे हाडवैरी असल्याप्रमाणे त्यांचा मनापासून द्वेष करून त्यांस इतके नीच मानण्याचे कारण काय असावे असे माझ्या मनांत नेहमी घोळत होते...''
ही प्रस्तावना दोन पानांची आहे. ती पूर्ण घेण्याचे येथे कारण नाही. सर्व प्रमुख जातींचा उल्लेख फुले प्रस्तावनेत करतात. विशेष म्हणजे या सर्व जातींना ‘क्षेत्री' या एकाच वर्गात घालतात. त्यात कुणबी आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की मराठा मात्र नाही. याचाच अर्थ मराठा ही जातच फुल्यांच्या काळी अस्सित्वात नसावी, असे स्पष्टच दिसून येते. तशी ती असती, तर फुल्यांनी तिचा उल्लेख जरूर केला असता. हा पवाडा फार श्रम करून तसेच जुनाट लेखी आधारावरून केला आहे, असे फुले म्हणतात, तेव्हा त्यांच्या नजरेतून मराठा सुटते ना. फुल्यांनी मराठा जातीचा उल्लेख न करता केवळ कुणबी जातीचा उल्लेख करणे, ही बाब त्यामुळे अत्यंत महत्त्वाची आहे.
आता फुल्यांचा प्रत्यक्ष पवाडा आपण पाहू. ‘शिवाजीचा पवाडा' असे साधे शीर्षक देऊन फुल्यांनी पवाडा लिहिला आहे. या पवाड्यातील काही उल्लेख असे -
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ।।
लंगोट्यांस देई जानवीं, पोषींदा कूणब्यांचा ।
काळ तो असे यवनांचा ।।
...पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।
थोर विठोजी नांव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ ।।
सवतीवर लोटती बाळा ।
डाग लाविला कुणबी कुळा ।। 
इंग्लिश ज्ञान होता म्हणे मी पुत्र क्षेत्र्याचा ।
उडवी फट्टा ब्रह्म्याचा ।।
जोतीरावाने फुल्याने गायीला पुत क्षुद्राचा ।
मुख्य धनी पेशव्याचा धनी ।।
फुल्यांच्या पवाड्यात शिवरायांच्या जातीबद्दल मराठा असा उल्लेख कुठेही येत नाही. तसेच कुळवाडी-भूषण, पाटील, कुणबी, क्षुद्र असे उल्लेख आवर्जून येतात. शिवरायांच्या बाबतीत   'पूत क्षुद्राचा'  असा स्पष्ट उल्लेख फुले करतात. तसेच उनाडांमुळे अस्मिता धोक्यात येते तेव्हा ‘डाग लाविला कुणबी कुळा'  असे नमूद करतात. ‘डाग लाविला मराठा कुळा'  असे फुले म्हणू शकले असते; पण ते तसे म्हणत नाहीत! ही बाबही अत्यंत महत्वाची आहे.
फुल्यांच्या एकूणच वाङ्मयात क्षत्रिय असा उल्लेख अनेकदा येतो; परंतु क्षेत्री म्हणजे मूळचे रहिवासी या अर्थाने फुले हा शब्द वापरतात. राजांच्या पवाड्यातही तो याच अर्थाने येतो. ‘पुत क्षेत्र्याचा'  हा उल्लेख त्या अनुषंगानेच आहे. सारांशाने असे म्हणता येते की, फुल्यांच्या काळी महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना कुणबी असेच संबोधन वापरले जात  होते. छत्रपती शिवरायांसारख्या महान विभूतीवर लिहिलेल्या पवाड्यात फुल्यांनी मराठा या शब्दाचा जात म्हणून उल्लेख का केला नाही, याचे समाधानकारक उत्तर कुणबी आणि मराठा या दोन स्वतंत्र जाती आहेत, असा दावा करणारया विचारवंतांनी द्यायला हवे. 
- अनिता पाटील, औरंगाबाद. 

9 comments:

  1. अनिताताई ,
    सप्रेम नमस्कार..
    आपले सर्वच लिखाण खूप छान वाटले .....
    मात्र ब्राम्हनाना राग येणे स्वाभाविकच आहें.

    ReplyDelete
  2. महादेव भैय्या मनापासून धन्यवाद. तुमच्यासारख्या जाणकारांकडून पसंतीची पावती मिळणे हे माझ्यासारख्या लेखिकेला टॉनिकसारखे आहे. माझ्या ब्लॉगला असाच पाqठबा देत राहाल, हीच अपेक्षा.

    ReplyDelete
  3. अनिता ताईस ,
    तुमचा कुणबी आणि मराठा हे एकच आहे हा लेख वाचला. मी जातींनी मराठा आहे. माझ्या मागील पिढीत कोणीही शिकलेलं नाही, त्यामुळे माझे सोयरे , पाहुणे ज्या कोणाच्या पिढीत जुने लोक शिकलेले आहेत. त्या सगळ्यांची जात कुणबी आशी आहे. या न्यायाने मीही कुणबी आहे. पण आमच्या घरात ( जुनी पिढी ) कोणी शिकलेलं नसल्याने माझ्या कोणाचाहि धाखला ( टी सी ) मिळत नाही.
    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही वर्षांशाठी ठराविक समाज्याला जे आरक्षण दिले ते बंद करण्याची हिम्मत एकाही राजकीय पक्षात नाही आणि जर आसे कोणी केले तर तो राजकीय पक्ष कायमचा नाहीसा होईल, अशा परीस्थित मराठी समाजाला जर आरक्षण मिळाले नाही तर बहूसख्य जरी असला तरी मराठा समाजाला त्याचे होणारे तोटे नक्कीच सहन करावे लागतील. .
    थोडक्यात मला आसे म्हणायचे आहे कि मराठा आणि कुणबी हे दोन हि
    शब्द्द जर एकाच अर्थाने वापरले जातात तर नक्कीच यावर संशोधन होणे गरजेचे आहे. कारण संत तुकाराम हे कायद्याने जरी मराठा असले तरी ते आपल्या अभंगात वेळोवेळी कुणबी आसाच स्वताचा ऊल्लेख करतात!
    मी खुठ्ल्या हि संघतनेसी जोडलेलो नाही. पण आता आसे वाटते आहे.
    कि खरच मराठा समाजाला एकत्र येण्याची गरज आहे.
    आपल्या मध्यमातून मी शर्व मराठी बांधवाना विनंती करतो कि काळाची गरज म्हणून एकत्र या आणि आपल्या पुढील पीडिला उज्वल भविष्य देण्यासाठी आजच प्रयत्न करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्राच आज आपल्याला तरु शकतो .
    शिका ,संघटीत व्हा, संघर्ष करा !
    कापसे.पांडुरंग.

    ReplyDelete
  4. अनिता जी तुम्ही खुप छान लेखन केले.तुम्ही हा इतिहास खुप चांगल्या पद्धतीने मांडला,त्याबद्दल तुमचे या राहुल कडून मनापासून आभार.जय जिजाऊ जय शिवराय

    ReplyDelete
  5. अनिता जी तुम्ही खुप छान लेखन केले.तुम्ही हा इतिहास खुप चांगल्या पद्धतीने मांडला,त्याबद्दल तुमचे या राहुल कडून मनापासून आभार.जय जिजाऊ जय शिवराय

    ReplyDelete
  6. धन्यवाद छान प्रयत्न.

    ReplyDelete
  7. खुप खुप आभार

    ReplyDelete
  8. जय जिजाऊ जय शिवराय
    बहुत बढ़िया लेख है
    कुणबी कुर्मी मराठा ये एक ही है
    आपका बहुत बहुत आभार

    ReplyDelete