Sunday 5 January 2014

नरेंद्र मोदी यांचा शिवरायांना मानाजा मुजरा

भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रविवारी रायगडावर मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाजा मुजरा, त्याप्रसंगीचे छायाचित्र. नंतर मोदी यांची जाहीर सभाहीही रायगडावर झाली. 
शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य विराट, महान असताना त्यांचे रुप फक्त युद्धापुरतचं मर्यादित ठेवण्यात आल्याबद्दल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली. संभाजीराव भिडे संस्थापक असलेल्या सांगलीच्या शिवप्रतिष्ठानने काढलेल्या महानगर ते रायगड या धारातीर्थ यात्रेच्या सांगता समारंभाप्रसंगी रायगडावर उपस्थित असलेले मोदी बोलत होते. रविवारी दुपारी मोदी यांचे हेलिकॉप्टरने रायगडच्या पायथ्याशी आगमन झाले. मोदींनी प्रथम शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली.

आपल्या भाषणादरम्यान छत्रपती शिवरायांचा जयजयकार करणा-या मोदींनी शिवाजी महाराजांचा इतिहास अयोग्यपणे मांडण्यात आल्याची टीका केली. महाराजांसारख्या महान पुरूषाचे रूप हे फक्त योदध्याच्या प्रतिमेत बंदिस्त ठेवल्याची खंत व्यक्त करताना त्यांचे कार्य खूप विराट व महान असल्याचे सांगितले. सुरत शहरातील मोहिमेदरम्यान महाराजांना तेथील स्थानिकांचेही सहकार्य मिळाले. व त्यामुळेच त्यांना औरंगजेबाचा खजिना लुटता आला. मात्र, इतिहासकारांनी या घटनेचा विपर्यास करत या घटनेचे वर्णन 'सुरत लुटली' असे केले असून हा शिवरायांचा घोर अपमान आहे, असेही ते म्हणाले.


महाराष्ट्राला अनेक महान पुरूषांची परंपरा लाभली असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज हे त्या महान पुरूषांपैकी एक असल्याचे ते म्हणाले. जनतेला आपल्या मुलाप्रमाणे मानणा-या महाराजांनी मुघलांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी लढाई लढली. मात्र त्यांच कार्य तेवढ्यापुरतच मर्यादित नाही. त्यांचे राजकारण, समाजकारण, जनतेशी त्यांची सहिष्णू वागणूक, त्यांच्या काळातील सुशासन, शेतक-यांसाठी त्यांनी केलेलं कार्य, इंग्रजांशी त्यांनी केलेला व्यापार, यासह अनेक लौकिकास्पद कामगिरी महाराजांनी केल्या असताना त्यांच रुप फक्त युद्धापुरतचं मर्यादित ठेवण्यात आले, ही खेदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

हिंदुस्थानात एकही भाषा नाही, ज्यात शिवरायांची दखल घेतली गेलेली नाही, असे सांगत देशातील सर्व भाषिकांना शिवरायांचे ज्ञान आहे. ते एक महान राजा होते, असे मोदी म्हणाले. तसेच शिवरायांच्या या महान भूमीला मी नमन करतो, असे ते म्हणाले. भारत कुशासनातून मुक्त होऊन देशात सुशासन येवो, अशी शक्ती या पवित्र भूमीतून मिळो, ही प्रार्थना मी करतो, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवराय, माता जिजाऊ यांना प्रणाम करत तसेच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भीडे गुरुजींचे आभार मानत मोदींनी आपल्या भाषणाची सांगता केली.

कोणतेही राजकीय भाष्य नाही 
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी पंतप्रधान झाले तर देशाचा सर्वनाश होईल अशी टीका केली होती. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर मोदी काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते, मात्र रायगडावरील भाषणात मोदींनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही.


1 comment:

  1. मी अस ऐकल होत की (नरेन्द्र मोदी म्हणाले़, शिवाजी महाराजाचा खोटा इतिहास इन्ग्रजानी लपवला न की ब्राम्हणानी) हे तुम्ही याठीकाणी नमुद केल नाही. अस का? मला वाटते तुम्ही वा अनिता पाटील विचार मन्च नरेन्द्र मोदी समर्थक आहात..

    ReplyDelete