Thursday 4 September 2014

ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग - ३

वेद प्रणित मार्गावर प्रहार

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.



जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यावर ब्राह्मण चवताळून उठवण्यास आणखी एक प्रमुख कारण म्हणजे महाराजांनी वेद आणि स्मृतींनी प्रतिपादिलेल्या भेदभावकारक मार्गावर केलेला प्रहार होय. आधीच्या लेखांत म्हटल्यांप्रमाणे प्रत्यक्ष वेदांमध्ये भेदभावाला स्थान नसले तरी नंतरच्या स्मृती ग्रंथांनी वेदवाङ्मयास ब्राह्मणांच्या पायाशी आणून बांधले. ब्राह्मणांना फुकट बसून खाण्याची सोय आणि स्त्री-शुद्रांना फक्त ढोर मेहनत करण्याचे कर्तव्य, अशी व्यवस्था स्मृतींनी निर्माण केली. कलियुगात ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण आहेत, असा सिद्धांत ब्राह्मणांनी रुढ केला. त्यामुळे ब्राह्मण वगळता इतर सर्व जातींना कुठलाही धार्मिक अधिकार उरला नाही. त्यांनी फक्त ब्राह्मणांची सेवा करायची. या विषारी व्यवस्थेविरुद्ध तुकोबांनी बंड पुकारले.

वेदांचे करायचे काय?
वेदप्रणित धर्माचा भारतीय जनमानसावर एवढा प्रचंड पगडा आहे की, वेदांना नाकारणारे पंथ पाखांड ठरतात. उदा. वेदप्रमाण्य नाकारल्यामुळे महानुभाव पंथाला मधली अनेक शतके जवळपास अज्ञातवासात काढावी लागली. अशा परिस्थितीत वेदांचे करायचे काय? असा प्रश्न तुकोबांसमोर होता. तुकोबांनी वेदप्रमाण्यावर कोणतेही भाष्य न करता, भेदभावावर प्रहार केला. तसेच वेद वेद काय करता, खुद्द वेदांनीच विठ्ठलाची महती गायली आहे, असे सांगून ब्राह्मण धर्मावर कडी केली. ही मात्रा उत्तम लागू पडली. लोकांच्या झुंडी तुकोबांचा उपदेश ऐकायला येऊ लागल्या. तुकोबा त्यांना सांगत :
वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची साधिला ।।
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावे ।।
कर्मकांड सोडा. विठोबाला शरण जा आणि नामस्मरण करा. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, खुद्द वेदांनीच हे सांगितले आहे, असे तुकोबा या अर्भगात म्हणतात.
तुकोबांच्या या मुत्सद्दीपणावर ब्राह्मण हडबडले. काय करावे, हे त्यांना कळेना. अशातच काही ब्राह्मण मंडळींनी तुकोबांचा अनुग्रह घेतला. त्यामुळे चिडलेल्या ब्राह्मणांनी प्रचार सुरू केला की, "नुसते भजन म्हटल्याने कुठे देव गवसतो का, त्यासाठी ब्राह्मणांच्या हस्ते अनुष्ठाने आणि इतर कर्मकांडे करणे आवश्यक आहे", असा प्रचार ब्राह्मणांनी सुरू केला. त्यावर तुकोबांनी ब्राह्मणांना थेट आव्हान देत म्हटले की, ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे एका ।।
तुकोबा म्हणतात, ब्राह्मणांना काहीच कळत नाही. नामस्मरणाने नक्की इश्वर भेटतो. नारायणाचे नाम घेणे हेच आचमन आणि संध्या होय. नित्य भजन हेच ब्रह्मकर्म होय.

कोणत्याही प्रकारे अर्थ समजून न घेता, वेदमंत्रांची घोकमपट्टी करणाèया ब्राह्मणांना तुकोबांनी वेडगळ म्हटले. तुकोबा म्हणतात : वेदांचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येरा ।।
याच अर्भगात तुकोबांनी उच्छेद जाला मारगाचा असे म्हणून तुकोबांनी वेदमार्गाला पूर्ण पराभूत केले आहे. 

ब्राह्मणांच्या पोषाखीपणावर प्रहार
कर्मकांडे नष्ट करायची असतील, तर ब्राह्मणांचे ब्राह्मणपणा ज्या बाबींवर अवलंबून आहे, त्यावर प्रहार करायला हवा, हे ओळखून तुकोबांनी शेंडी, जाणवे, सोवळे या बाह्य संकेतांवर जोरदार प्रहार केला. "शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।" या अभंगात तुकोबांनी केलेला प्रहार किती घातक होता, हे लक्षात येते. तुकोबा म्हणतात की, शेंडी आणि जाणवे यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील.शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तू खरा ब्राह्मण होशील. 
येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, वेदप्रणित मार्गाचा उच्छेद करीत असताना तुकोबाराय नामस्मरणाचा सोपा पर्यायी मार्गही त्यासोबत देत आहेत. 

लेखात आलेले अभंग
(या लेखात आलेल्या अभंग पंक्ती पुढील अभंगांतून घेतल्या आहेत. देहू संस्थानने छापलेल्या गाथ्यातून या अभंग संहिता घेतल्या आहेत. वाचकांच्या सोयीसाठी गाथ्यातील अभंग क्रमांक अभंगांच्या शेवटी दिले आहेत.) 

ब्राह्मणा न कळे आपुले ते वर्म । गवसे परब्रह्म नामे एका ।।१।।
लहान थोरासी करितो प्रार्थना । दृढ नारायणा मनी धरा ।।ध्रु।।
सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ।।२।।
केशव नारायणा करिता आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ।।३।।
नामे करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायी ।।४।।
तुका म्हणे हे चि निर्वाणीचे शस्त्र । म्हणोनि सर्वत्र स्मरा वेगी ।।५।।
(अभंग क्रमांक ४३५६) 
अर्थ : परब्रह्म हे नामामुळेच प्राप्त होते, हे वर्म ब्राह्मणाला कळत नाही. म्हणून माझी सर्व लहान थोरांस विनंती आहे की, त्यांनी नारायणाला मनी धरावे. श्रीपतीची आठवण मनात ठेवा ही माझी सर्वांना विनंती आहे. साधे पाणी पिताना केशव नारायणाची आठवण काढली की संध्या आणि स्नानादी कर्म होऊन जाते. भोजन करताना नामस्मरण केले की सर्व प्रकारची ब्रह्मकर्मे आपोआप पूर्ण होतात. तुकोबा सांगतात की, नामस्मरण हेच निर्वाणीचे शस्त्र आहे, म्हणून नामस्मरण करा.

वेदांचे गव्हर न कळे पाठका । अधिकार लोका नाही येरा ।।१।।
विठोबाचे नाम सुलभ सोपा रे । तरी एक सरे भवसिंधू ।।ध्रु।।
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ।।२।।
तुका म्हणे विधी निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ।।३।।
(अभंग क्रमांक ३१५) 
अर्थ - वेदांचे पठण करणा-यांनाही ते काय वाचित आहेत, हे कळत नाही. तसेच वेद वाचण्याचा आणि ऐकण्याचा अधिकारही इतरांना (स्त्री-शुद्रांना) नाही. वेद वाचण्यापेक्षा विठोबाचे नाम घेणे अधिक सुलभ आणि सोपे आहे. विठूनामाच्या स्मरणानेच भवसिंधू तरून जाता येईल. वेदांतील मंत्र-तंत्र जाणत्या लोकांनाही असाध्य आहेत, मग अज्ञानी लोकांची काय कथा? तुकोबा म्हणतात की, विठोबाच्या सोप्या नाम मार्गाने व्यर्थ विधिनिषेध सांगणारा वेदाचा मार्ग लोपला आहे. वेदाच्या मार्गाचा पूर्ण उच्छेदच झाला आहे. 

वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला ।।१।।
विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावे ।।ध्रु।।
सकळ शास्त्रांचा विचार । अंति इतका चि निर्धार ।।२।।
अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ।।३।।
(अभंग क्रमांक ४०४९) 
अर्थ - वेदाने अनेक प्रकारची बडबड केली आहे. पण त्यातून त्याने एकच गोष्टशोधली. ती म्हणजे विठोबाला शरण जाणे आणि त्याचे नाम गाणे. सर्व शास्त्रांचा शेवटी हाच विचार आणि निर्धार आहे. तुकोबा सांगतात की, अठरा पुराणांत विठोबाला शरण जाणे हा एकच सिद्धांत आणि हेतू आहे. 

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।
त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।। 
बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।
शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।
तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।। 
(अभंग क्रमांक ३९१०) 
अर्थ - शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील. 

6 comments:

  1. तुकारामांच्या नास्तिकतेचा अत्युच्च बिंदू.........

    तुकारामांनी आपल्या एका वचनात नास्तिकतेचा अत्युच्च बिंदू गाठल्याचे आढळते.त्यांचे ईश्वराविषयक चिंतन किती विधायक होते, याचा निर्णायक पुरावा म्हणून या वचनाकडे पाहता येईल. देव आहे असे वाणीने वदवावे, पण मनामध्ये मात्र देव नाही असा अनुभव घ्यावा, या अर्थाने त्यांचे हे वचन भल्या भल्या भाष्यकारांना आव्हानही देईल आणि झुकांड्याही देईल, असे आहे. तुकाराम चार्वाकांसारखे आणि त्यांच्या इतके निरीश्वरवादी होते, असे या वचनाच्या आधारे मला मुळीच म्हणायचे नाही. तरीही त्यांच्या ईश्वर विषयक चिंतनात जात परंपरागत विचारांपेक्षा फार फार वेगळी आहे, एवढे मात्र नक्कीच म्हणणे भाग आहे.

    सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने अशा ईश्वराचे अस्तित्व आवश्यक असले, तरी जो स्वतःच्या परिपक्व विवेकाच्या आधारे झुंजू शकतो, त्याला आपल्या या विवेकाखेरीज वेगळा असा कोणी ईश्वर प्रत्यक्षात अस्तिवात नसतो, हे स्वतःच्या मनात अनुभवता येते. पितळेच्या वा पाषाणाच्या मूर्तीत ईश्वर नाही, असे ते सांगतात, याचा अर्थही ते ईश्वराच्या स्वरूपाकडे फार वेगळ्या दृष्ठीने पाहतात, हाच आहे. देव नाही असा अनुभव मनात घ्यावा, या वचनाच्या उच्चाराद्वारे तुकारामांनी सत्याविषयीचे चिंतन तर अत्युच्च स्तरावर नेलेच, पण ते सत्य मांडताना उच्च कोटीचे धैर्यही प्रकट केले, असेच म्हटले पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ।। ४२२६.१

      श्री महाराजांची हि अनुभवाची वाणी आहे.
      देव पहावयास गेलो आणि देवची झालो हा सर्वच संताचा अनुभव आहे.
      बाहेर वाणीने, वाचेने सांगताना दुसऱ्याला देव आहेच आहे असे सांगावे लागते, पण आपण स्वतः त्याचा अनुभव नाहीपणानेच घ्यावा लागतो, तो याच प्रकारे म्हणजे मी नाही, केवळ देव आहे असाच येतो.मग जिथे सांगणारा'मी' च नाहीस होतो तेव्हा ज्याला सांगायचे तो 'तू' चा अनुभवही अर्थात मावळतो. अर्थात सांगणेही थांबते.

      Delete
    2. आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ।। ४२२६.१

      श्री महाराजांची हि अनुभवाची वाणी आहे.
      देव पहावयास गेलो आणि देवची झालो हा सर्वच संताचा अनुभव आहे.
      बाहेर वाणीने, वाचेने सांगताना दुसऱ्याला देव आहेच आहे असे सांगावे लागते, पण आपण स्वतः त्याचा अनुभव नाहीपणानेच घ्यावा लागतो, तो याच प्रकारे म्हणजे मी नाही, केवळ देव आहे असाच येतो.मग जिथे सांगणारा'मी' च नाहीस होतो तेव्हा ज्याला सांगायचे तो 'तू' चा अनुभवही अर्थात मावळतो. अर्थात सांगणेही थांबते.
      वेद ही सगळं सांगून झाल्यावर शेवटी नेती, नेती म्हणून मौन होतात.साखरेची गोडी हि शब्दात कधीच सांगता येत नाही, ती अनुभवावी लागते.
      धन्यवाद

      Delete
  2. आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाही ऐसा मनीं अनुभवावा ।। ४२२६.१

    तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।। ११४.१

    देवाची पूजा हे भूताचे पाळण ।। ३८५४.१

    जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
    तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
    मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥
    ज्यासीं अपंगिता पाही । त्यासई धरी जो हृदयी ॥४॥
    दया करणे जे पुत्रासी । तोचि दासा आणि दासी ॥५॥
    तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ॥ ६॥ ३४७

    -संत तुकाराम

    ReplyDelete
  3. हो बरोबर आहे चार्वाकांनी सुद्धा तेच सांगितले आहे. जे तुकारामांनी सांगितले आहे.

    ReplyDelete
  4. हो बरोबर आहे चार्वाकांनी सुद्धा तेच सांगितले आहे. जे तुकारामांनी सांगितले आहे.

    ReplyDelete