Monday 18 August 2014

साध्वीवर होती "जोशी"ची वाईट नजर?

हे पाहा संघाचे संस्कार 


साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक सुनील जोशी याची वाईट नजर होती आणि जोशी याच्या हत्येमागे ते एक प्रमुख कारण होते, अशी खळबळजनक बाब एनआयएच्या तपासातून पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे. 

२००७ मध्ये झालेल्या सुनील जोशीच्या हत्येप्रकरणी मध्य प्रदेशमधील देवास पोलिसांनी आधीच साध्वी प्रज्ञा हिच्यावर आरोप ठेवलेले आहेत. आता एनआयए या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार असून साध्वीचे नाव पोलीस आणि एनआयए अशा दोन्ही तपास यंत्रणांच्या आरोपपत्रात असणार आहे.

'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, जोशीची वाईट नजर साध्वीवर पडली होती. तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. शिवाय अजमेर बॉम्बस्फोटाबाबत जोशी सर्व माहिती उघड करेल, अशी भीती साध्वीला होती. त्यातूनच जोशीची हत्या घडवून आणण्यात आली असावी, असा एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

२९ डिसेंबर २००७ रोजी सुनील जोशी याची हत्या करण्यात आली होती. राजेंद्र आणि लोकेश या दोन आरोपींनी ही हत्या केली होती. हे दोघे आणखीही कटात सामिल होते. मुस्लिमांवर आणखी हल्ले करण्याची योजना ते आखत होते, असेही एनआयएच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Wednesday 13 August 2014

ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग- २

तुकोबांनी ब्राह्मणांच्या भोंदुगिरीचा पर्दाफाश केला

हिंदू धर्मातील परंपरेने ब्राह्मणांना कोणतेही काम न करता बसून खाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. ही व्यवस्था पूर्णतः भोंदूगिरीवर आधारलेली होती. तुकोबांनी या भोंदूगिरीला तीव्र विरोध केला. तुकोबांनी केलेला हा विरोध जनमानसाला पटला. तुकोबांना मोठा अनुयायी वर्ग मिळाला. ब्राह्मणांच्या भोंदूगिरीचे पितळ उघडे पाडणारे अभंग लोकांच्या तोंडी खेळू लागले. या पाश्र्वभूमीवर ब्राह्मणांच्या पोटापाण्याचा उद्योग धोक्यात आला. तसेच त्यांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांविरुद्ध चवताळून उठले. 
ब्राह्मणांचा पोटापाण्याचा उद्योग त्यांच्या भोंदूगिरीवर अवलंबून होता. आजही काही प्रमाणात आहे. तुकोबांनी बाह्य देखाव्याला नेहमीच विरोध केला. ब्राह्मणी कर्मकांडात बाह्य देखाव्यालाच महत्त्व होते. इतकेच काय ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि कमरेचे सोवळे हा वेशही दिखाऊच होता. या वेशानुसा येणा-या आंतरिक शुद्धता ब्राह्मण पाळत नव्हते. या वेशाचा वापर केवळ दक्षिणा उकळण्यासाठी केला जात होता. बाह्य वेशाला पाहूनच लोक भूलतात आणि भोंदुगिरीचे शिकार होतात. उदा. रावण संन्याशाचा वेश परिधान करून आला, त्यामुळेच सीता लक्ष्मण रेषा ओलांडून त्याच्या तावडीत येऊ शकली. ब्राह्मणांचा शेंडी, जानवे आणि सोवळे हा वेशही याच प्रकारचा होता. त्यामुळे तुकोबांनी "शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।" अशाा शब्दात शेंडी आणि जानवे तोडून फेकण्याचा सल्ला ब्राह्मणांना दिला. 

ब्राह्मणांच्या पैसे कमावण्याच्या उद्योगात पुराणे आणि पोथ्यांतील कथा सांगणे याचा मुख्यत्वाने समावेश होता. नुसती पुराणे सांगून आणि ऐकून काहीच होत नाही. माणसात आंतरिक बदल झाला पाहिजे, हे ओळखून तुकोबानी पुराण कथनावर प्रहार केला.  तुकोबा म्हणतात : 
जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।
गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।
अशा पोथ्या-पुराणे सांगण्याच्या या उद्योगाला तुकोबांनी थेट "गाढव ओझ्या"ची उपमा दिली आहे. हा आघात प्रचंड मोठा होता. 

तीर्थस्थाने हा ब्राह्मणांच्या कमाईचा आणखी एक भाग. तीर्थावर विविध प्रकारची व्रते आणि विधि करायला सांगून ब्राह्मण गोरगरिब आणि अज्ञानी लोकांकडून पैसे उकळित असत. त्यावर तुकोबांनी प्रहार केला. तीर्थस्थानांवर जाऊ नका. तेथे दगडधोंड्यांशिवाय काहीच नाही. तीर्थांवर तुम्हाला देव भेटणारच नाही. देव हा संत-सज्जनांमध्ये आहे. संतसज्जनांच्या सहवासात राहा, तुम्हाला देवाचा साक्षात्कार आपोआप होईल, असा उपदेश तुकोबांनी केला. "तीर्थी धोंड पाणी । देव रोकडा सज्जनी ।।" हा तुकोबांचा अभंग जिज्ञासूंनी जरूर पाहावा. 

ब्राह्मण स्वतः श्रेष्ठ समजत. इतर जातीतील कोणाही व्यक्तीचा स्पर्शही त्यांना वज्र्य होता. त्यासाठी ब्राह्मणांनी सोवळ्या-ओवळ्याची चाल लोकांत लावून दिली. ब्राह्मणांच्या या कथित श्रेष्ठत्वास तुकोबांनी "सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।" या शब्दांत सुरुंग लावला. देवाचा अंगिकार जेणे केला, तो प्रत्येक जण सोवळा म्हणजेच पवित्र आहे, अशी घोषणा तुकोबांनी केली. ब्राह्मणांचे जाती श्रेष्ठत्व तुकोबांनी अशा प्रकारे एका फटक्यात नष्ट करून टाकले. 

तुकोबांच्या या उपदेशामुळे ब्राह्मणांचे पोटापाण्याचे खोटारडे उद्योग बंद पडू लागले. त्यांचे जाती श्रेष्ठत्व धोक्यात आले. एक प्रकारे त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला. त्यामुळे ब्राह्मण तुकोबांवर चवताळून उठले. 

या लेखांतील विवेचनात आलेले मूळ अभंग खाली देत आहोत. हे अभंग देहू संस्थानने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. मूळ गाथ्यात हे अभंग जिज्ञासूंना पाहता यावेत यासाठी त्यांचा गाथ्यातील क्रमांक अभंगाच्या शेवटी दिला आहे. 

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तू जाण श्रुतिदास ।।१।।
त्याची तूज काही चुकता चि नीत । होशील पतित नरकवासी ।।ध्रु।। 
बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुको नको ।।२।।
शिखा सूत्र याचा तोडी तूं संबंध । मग तुज बाध नाही काही ।।३।।
तुका म्हणे तरी वत्र्तुनि निराळा । उमटती कळा ब्रह्मीचिया ।।४।। 
(अभंग क्रमांक  ३९१०) 
अर्थ -  शेंडी (शिखा) आणि जाणवे (सूत्र) यात तुझा जीव अडकलेला आहे, तोपर्यंत तू श्रुतींचा म्हणजेच वेदांचा दासच राहशील. तुला यातून काहीच लाभ होणार नाही. तू नक्कीच नरकात जाशील. तू खूप चतूर, शहाणा असशील, पण ते निरुपयोगी असून शुद्ध आचरणच महत्वाचे आहे. त्यामुळे आचरण शुद्ध ठेवण्यास चुकू नको. शेंडी आणि जाणवे तू तोडून टाक, मगच तुला काही बाधा येणार नाही. तुकोबा म्हणतात, अशा प्रकारे शेंडी आणि जाणव्याच्या बाह्य उपचारांपेक्षा आतून वृत्तीने तू निराळा हो, तेव्हाच तुझ्यात ब्रह्मकळा उमटतील.  

जालासी पंडीत पुराण सांगसी । परी तू नेणसी मी हे कोण ।।१।।
गाढवभरी पोथ्या उलथिसी पाने । परी गुरुगम्य खुणे नेणशी बापा ।।ध्रु।।
तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ।।३।। 
(अभंग क्रमांक  ४३६९) 
अर्थ - तू पंडीत होऊन पुराण सांगतो आहेस, पण आपण कोण आहोत याचीच ओळख तुला नाही. गाढवाचे ओझे असलेल्या पोथ्यांची पाने तू उलटत राहतोस, पण गुरुला माहिती असलेली कोणतीही खूण (आत्मज्ञान) तू जाणत नाहीस. कुणब्याचे तुकोबा कोणतेही शास्त्रमत जाणत नाहीत, पण ते पंढरीनाथास विसरत नाहीत. (विठोबाला शरण जाणे हीच खरी आत्मखुण आहे. )

तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।।१।।
मिळालिया संत संग । समर्पिता भले अंग ।।ध्रु।।
तीर्थी भाव फळे । येथे अनाड ते वळे ।।२।।
तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ।।३।।
(अभंग क्रमांक  ११४) 
अर्थ - तीर्थ स्थळावर केवळ दगड आणि पाणी आहे. खरा देव सज्जन माणसांमध्येच आहे. तीर्थावर स्नान करून कोणाचेही अंग भले म्हणजे पवित्र होणार नाही. संतांची संगतीत समर्पित झाल्यानेच ते भले होईल. तीर्थावर भाव फळतो, म्हणजे तीर्थावरील ब्राह्मणाला दक्षिणेच्या रूपाने फळ मिळते. संतांच्या सहवासात मात्र अडाणीही योग्य वळणावर येतात. तुकोबा सांगतात की, संत संगतीने पाप आणि ताप जातो. याची प्रचितीही लगेच येते. 

सोवळा तो जाला । अंगिकार देवे केला ।।१।।
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ।।ध्रु।।
चुकला हा भार । तयाचिच येर झार ।।२।।
तुका म्हणे दास । जाला तया नाही नास ।।३।। 
(अभंग क्रमांक  ४२२७) 
अर्थ - सोवळ्या ओवळ्याचे ढोंग पसरवू नकोस, कारण ज्याने देवाचा अंगिकार केला आहे, तो सोवळा झालेला आहे. इतरेजण (जे देवाचा अंगिकार करीत नाहीत असे) दुर्जन असून केवळ पोट पोसण्यासाठी भोजन करतात. जो देवाचा अंगिकार करीत नाही त्याला जन्ममृत्यूची येरझार अटळ आहे. तुकोबा म्हणतात की, जो विठ्ठलाचा दास होतो, त्याचा कधीही नाश होत नाही. 


संबंधित लेख


Friday 1 August 2014

ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? भाग-१

तुकोबांनी ब्राह्मणांचा धर्मावरील विशेषाधिकारच नाकारला

-राजा मइंद, कार्यकारी संपादक, अपाविमं.

महाराष्ट्रातील त्या काळातील ब्राह्मण तुकोबांवर का चवताळले? तुकोबांची हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल का गेली? या प्रश्नांची उत्तरे तुकोबांच्या गाथ्यातच सापडतात. भारतात खोलवर रुजलला ब्राह्मणी धर्म भेदभावाच्या पायावर उभा आहे. ब्राह्मण ही जात यात मोठी लाभधारक आहे. या ब्राह्मण धर्माच्या पायावरच तुकोबांनी घाव घातला. परंपरेने ब्राह्मणांना जातीनिष्ठ श्रेष्ठत्व दिले होते. ते तुकोबांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. केवळ ब्राह्मण कुळात जन्मला म्हणून कोणीही ब्राह्मण होत नाही, अशी घोषणा तुकोबांनी केली. इतकेच नव्हे, तर ब्राह्मण होण्याचा अधिकार कोणालाही आहे, अशी नवी व्याख्याही त्यांनी केली. तुकोबा म्हणतात की, एखादा मनुष्य अंत्यजाच्या कुळात (सर्वांत हीन जातीत) जन्मला असेल, मात्र तो निस्सीम विठ्ठल भक्त असेल, तर त्याला ब्राह्मणच समजायला हवे. तुकोबांचा या संबंधीचा अभंग असा -
ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।। रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।। 
याच्या विरुद्ध बाजूने विचार मांडताना तुकोबा म्हणतात की, भक्तीहीन असलेल्या ब्राह्मणास अंत्यज मानावे. हा विचार अंत्यंत क्रांतीकारक आहे. ही क्रांती घडविण्यासाठी तुकोबांची वाणी विजेसारखी कडाडते. तुकोबा लिहितात -
अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।। 
त्याही पुढे जाऊन तुकोबा म्हणतात की, अशा भक्तीहीन ब्राह्मणाला जन्म देणारी स्त्री नक्कीच व्याभिचारी असली पाहिजे. 
हा हल्ला इतका घणाघाती आहे की, त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांना ती पचणे कठीण झाले असणार. 
धार्मिक न्यायनिवाड्याचा अधिकार
ब्राह्मणी परंपरेने धार्मिक न्याय-निवाडा करण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांना दिला आहे. ब्राह्मण कोणाला म्हणायचे आणि ब्राह्मणत्व कोणाला नाकारायचे याचे अधिकार ब्राह्मणांच्या धर्मसभेला होते. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना ब्राह्मण्याचा हक्क पैठणच्या पंडितांनी नाकारला होता. धर्मपंडितांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना पतितसावित्रिक ठरवून मौंजीचा अधिकार नाकारला होता. धर्मपंडितांचा हा अधिकार जन्माधिष्ठित जातीवर आधारित आहे. ब्राह्मणाखेरीज इतर कोणत्याही जातीतील व्यक्तीला हा अधिकार नाही. मात्र कुणव्याच्या कुळात जन्मलेल्या तुकारामांनी ब्राह्मण जातीचा हा विशेषाधिकार धुडकावून लावला. इतकेच नव्हे, तर तो स्वत:च्या हाती घेऊन ब्राह्मण कोण याचा निवाडा करणारे अभंग रचले. ते अभंग महाराष्ट्रभर लोकप्रियही झाले. त्यामुळे ब्राह्मण चवताळून उठले. तुकोबांच्या हत्येमागील हे एक प्रमुख कारण आहे. 

तुकोबांच्या गाथ्यात ब्राह्मण कोणाला म्हणायचे याचा न्यायनिवाडा करणारे असंख्य अभंग आहेत. त्यातील मोजके अभंग खाली देत आहोत. सोबत सुलभ अर्थही दिला आहे. हे अभंग देहू संस्थानाने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातून घेतले आहेत. प्रत्येक अभंगाच्या शेवटी संबंधित अभंगाचा गाथ्यातील अनुक्रमांक दिला आहे. 

ब्राह्मण तो याती अंतेज असता । मानावा तत्वता निश्चयेसी ।।१।।
रामकृष्ण नाम उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनी ।।ध्रु।।
शांति क्षमा दया अलंकार अंगी । अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।२।।
तुका म्हणे गेल्या शडउर्मी अंगे । सांडुनिया मग ब्रह्म चि तो ।।३।।
(अभंग क्रमांक : १२३०)
अर्थ- रामकृष्ण हे साधे सोपे सरळ नाम जो उच्चारतो, तसेच सावळ्या विठ्ठलाचे रूप मनात आठवतो, तो अंत्यज जातीत जन्मला असला तरी ब्राह्मणच आहे. ज्याच्या अंगी शांती, क्षमा आणि दया हे अलंकार आहेत, जो कुठल्याही प्रसंगी अभंग राहतो, असा धैर्यवंत मनुष्य ब्राह्मणच समजावा. तुकोबा सांगतात की, षडविकार ज्याने सांडिले आहेत, तो कुठल्याही जातीत जन्मलेला असला तरी साक्षात ब्रह्मरूप आहे. 

अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ।।१।।
वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयता कूळ याती ।।ध्रु।।
ऐसा हा निवाडा जालासे पुराणी । नव्हे माझी वाणी पदरींची ।।२।।
तुका म्हणे आगी लागो थोरपणा । दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी ।।३।।
(अभंग क्रमांक : १३४४) 
अर्थ - ब्राह्मण जातीत जन्म घेऊनही जो मनुष्य भक्ती करीत नाही, त्याचे तोंड जळू दे. असा ब्राह्मण रांडेच्या पोटी जन्मला आहे का? चांभार कुळात जन्मलेला मनुष्य वृत्तीने वैष्णव असेल, तर त्याची माता खरोखरच धन्य होय. अशा मनुष्याच्या माता आणि पिता अशा दोन्हीकडची कुळे शुद्ध समजावी. हे मी माझ्या पदरचे सांगत नाही, पुराणांनीच हा नियम केला आहे. तुकोबा म्हणतात की, अभक्त असलेला माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या मोठेपणाला आग लागो, तो माझ्या दृष्टीलाही पडू नये. 

ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी । पाहा श्रुतीमधी विचारूनि ।।१।।
जयासी नावडे हरिनाम कीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचे ।।ध्रु।।
सत्य त्याचे वेळे घडला व्याभिचार । मातेशी वेव्हार अंत्यजाचा ।।२।।
तुका म्हणे येथे मानी आनसारिखे । तात्काळ तो मुखे कुष्ट होय ।।३।।
(अभंग क्रमांक : १२२९) 
अर्थ - ज्याला हरिनाम, कीर्तन आणि वैष्णवांचे नृत्य आवडत नाही, तो ब्राह्मणच नाही. श्रुतीमध्ये म्हणजेच वेदांमध्येच हे लिहिले आहे. हरीनाम, कीर्तन न आवडणारा मनुष्य ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो खरोखर ब्राह्मण असणे शक्य नाही. त्याच्या मातेने अंत्यजाशी व्याभिचार करूनच त्याल जन्माला घातले असले पाहिजे. तुकोबा म्हणतात की, तोंडाने हरीनाम घेणा-या अशा माणसाच्या मुख तात्काळ कुष्टाचे होईल.